भिकाऱ्यांची रस्त्यांवर अरेरावी

भिकाऱ्यांची रस्त्यांवर अरेरावी

जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे. त्यामुळे या शहरामध्ये दोन वेळेच्या अन्नाची सोय होईल, या आशेने हजारोंच्या संख्येने भिकाऱ्यांचे लोंढे येत आहेत. अशातच भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जात असून वर्दळीच्या रेल्वेस्थानकासह इतर विभागांमधील सिग्नलवर चालकांचा पाठलाग करून वेठीस धरले जात आहे.
झपाट्याने होणारा विकास पाहता मुंबईपाठोपाठ नवी मुंबई शहर आता बेघर तसेच भिकाऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहे. शहरातील एखाद्या सिग्नलवर टोळक्याने वावरणारे या भिकाऱ्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. या भिकाऱ्यांनी शहरातील बस, रेल्वेस्थानके, उड्डाण पूल, पदपथ तसेच रस्त्याच्या कडेला बस्तान बसवले आहे. यात वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, खारघर, पनवेल रेल्वेस्थानकाबरोबर नवी मुंबई शहरातील वाशी सिग्नल, सायन-पनवेल महामार्गावरील वाशी उड्डाण पुलाखाली, पामबीच मार्गावरील सिग्नल, सिडको भवन येथे भीक मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
-------------------------------------------------
कायदेशीर कारवाईत त्रुटी
या भिकाऱ्यांवर अनेक वेळा पोलिसांकडून कारवाई केली जाते. कारवाई केलेली मुले व पुरुषांना राज्याच्या समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत असलेल्या चेंबूर नाका येथे बेघरांच्या वसाहतीमध्ये ठेवले जाते, तर लहान मुली आणि स्त्रियांना देवनार येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, असे असताना भिकाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने प्रशासकीय यंत्रणांना नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.
-------------------------------------------------
पैसे घेतल्याशिवाय माघार नाही
मुख्य रस्त्यावर बिनधास्तपणे फिरणारी ही लहान मुले भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या, वाहतुकीत होणारा अडथळा या कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता चालकांकडून पैसे मिळाल्याशिवाय माघार घेत नाहीत. काही लहान मुले सिग्नलवर गाडी थांबलेली पाहताच गाडी पुसून जबरदस्तीने पैशांची मागणी करतात. शाळा, कॉलेजच्या आवारात मुलांच्या हातातल्या वस्तू पळवून नेल्या जात आहेत.
----------------------------------------------
भिकाऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळे येऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात भरारी पथक नेमले आहे. प्रत्येक पोलिस ठाणे परिसरातील भिकाऱ्यांच्या टोळीवर या पथकाकडून कारवाई केली जाते.
- तिरुपती काकडे, उपायुक्त (वाहतूक विभाग) नवी मुंबई पोलिस
------------------------------------
रेल्वे, बसस्थानकाच्या बाहेर सिग्नलवर लहान मुले खायला नाहीतर पैशांसाठी विनवणी करतात. आपण पैसे दिले नाही तर पाठीच लागतात. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.
- श्रेया सोलंकी, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com