manohar joshi
manohar joshi sakal

Manohar Joshi : बॉम्बेचे मुंबई करणारा मुख्यमंत्री, जाणून घ्या मनोहर जोशी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय

मुंबईतल्या भूमिपुत्रांच्या नोकरीची समस्या हाती घेऊन रान उठवणारी शिवसेना पाहता पाहता वणव्यासारखी पसरली अन् नाक्यावरचा मराठी माणूस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भक्त झाला.

मुंबई : मुंबईतल्या भूमिपुत्रांच्या नोकरीची समस्या हाती घेऊन रान उठवणारी शिवसेना पाहता पाहता वणव्यासारखी पसरली अन् नाक्यावरचा मराठी माणूस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भक्त झाला. भावनेवर चालणारे शिवसैनिक कायदा हातात घ्यायला मागेपुढे बघत नसत.

हा ‘अंगार’ शिवसेनेला धगधगत ठेवणारा होता खरा, पण निवडणुकीच्या राजकारणात येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेनेला संसदीय चौकटीत बसवणारे शालिन रूपही आवश्यक होते. प्रतिकुल परिस्थितीतून आलेल्या मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या सनदशीर वाटचालीसाठी आवश्यक असलेली ही जागा भरुन काढली.

मराठी माणूस शिवसेना आणि मुंबईचे हे रसायन मनोहर जोशींना पुरते उमगले होते. १९९५ रोजी भाजप आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासह शिवसेना प्रथमच सत्तेत आली अन शिवसेना नेते मनोहर जोशी पक्षाचे पहिलेवहिले मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी ‘बॉम्बे’चे मुंबई करा, ही मागणी लावून धरली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतही मागणी करताच केंद्र सरकारने योग्य ती प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले.

नियमानुसार हरकती आणि सूचना मागवल्यानंतर केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर हे उचित होणार नाही, असा आक्षेप घेतला. मात्र जोशी यांनी मुत्सद्देगिरीने सर्व अडथळे पार करत ‘बॉम्बे’ किंवा ‘बंबई’ची मुंबई केली. शिवसेनेच्या मार्गावर चालत मद्रासचे चेन्नई झाले आणि कलकत्त्याचे कोलकाता. मनोहर जोशींनी तीन पायांचे सरकार चालवताना भाजपला मर्यादेत ठेवले.

शिवसेना-भाजप युती सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेल्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, एक रुपयात झुणका भाकर, खासगी भांडवलाव्दारे ‘बांधा वापरा, हस्तांतरित करा’ या तत्वावर निर्माण झालेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कृष्णा खोऱ्यातील सिंचन सुविधा यासारख्या कित्येक पायाभूत सुविधा महाराष्ट्राचे चित्र बदलणाऱ्या ठरल्या. प्रगतीचा मार्ग अनुसरताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कायम मान देत त्यांचा विश्वास संपादन केला.

manohar joshi
Manohar Joshi: 'मी मुख्यमंत्री पण वाहन महापौरांचं..', मनोहर जोशींनी का वापरली फडणवीसांची गाडी? सांगितला भावूक किस्सा

‘मला ऐकू आले नाही’ म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधी भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही. ’मातोश्री’ची मर्जी राखण्याचे त्यांचे हे कौशल्य शिवसेनेतल्या कित्येकांच्या असूयेचा विषय झाले होते. नंतर राजकीय कारकिर्द शिवसेनाप्रमुखांची मर्जी खप्पा झाल्याने अर्धवट स्थितीत संपली तरी ते शांत राहिले. पण या संयमामुळेच नंतर लोकसभेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालत आले.

चारही सभागृहांचे सदस्य

जागतिक मराठी परिषदेपासून तर नागपुरातील विदर्भ साहित्यसंघ, राजाराम वाचनालय अशा संस्थांना त्यांनी मदत केली. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या चारही सभागृहांचे सदस्य होण्याचा मान त्यांनी मिळवला. यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच हा मान मिळवला.

मुंबईकरांना भावणारे क्रिकेटचे विश्व, साहित्य मंडळ यातही त्यांनी उठबस सुरु केली होती. ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकरांसमवेत मुंबईत मुशाफिरी करत फिरलेले ‘सर’ अत्यंत कुशाग्र होते अन् तेवढेच मुत्सद्दीही. त्यांनी राष्ट्रीय परिषदात मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राची खंबीर बाजू मांडली, तेव्हा त्यांच्या नवखेपणातील प्रगल्भतेने पश्चिम बंगालचे अनुभवी मुख्यमंत्री ज्योती बसूही प्रभावित झाले होते, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे सांगतात. त्यांनी ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ साठी मालिका लिहिली आणि ती लोकप्रिय ठरली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com