वणव्यांमुळे जंगलाचा नाश

वणव्यांमुळे जंगलाचा नाश

वज्रेश्वरी, ता. १७ (बातमीदार) : जागतिक तापमानातील वाढ अन् हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकारकडून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे; मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर जंगलात लागत असलेल्या वणव्यामुळे जंगले नष्ट होत आहेत. त्यातच वणवे आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीच्या अभावामुळे वनकर्मचारी हतबल झाले आहेत. भिवंडी तालुक्यातील मौजे दुगाड रेंज, चिंबीपाडा, उसगाव येथील जंगलात वणवे लागले आहेत; मात्र वणवा नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामुग्री नसल्याने वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

भिवंडी तालुक्याला नऊ हजार हेक्टर वनक्षेत्र हे राखीव लाभले आहे. या वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी गणेशपुरी, दुगाड भिवंडी, चिंबीपाडा व असे वन परिमंडळ परिक्षेत्र आहेत. येथील वनपाल, वनरक्षकाच्या व मनुष्यबळ कमी आहे. एवढ्या मोठ्या वनक्षेत्रात डोंगरावर वणव्याने लागणाऱ्या आग नियंत्रणात आणण्यासाठी केवळ तीन ब्लोअर मशीन (आग प्रतिबंधक यंत्र) आहेत. त्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. यामुळे येथील वन कर्मचारी वाढत्या वणव्यांपुढे हतबल झालेले दिसतात.

शिकारीसाठी जंगलांना आग
भिवंडी तालुक्यातील अनेक पाडे जंगलात वसलेले आहेत. उसगाव तसेच येथील गणेशपुरी टेकडी मागील जंगल हा वनविकास महामंडळाच्या अधिपत्याखाली येत असून या ठिकाणी देखील वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. तसेच पाड्यावर जाणारे रस्ते जंगलातूनच जात असल्याने वाटसरू पेटती विडी, सिगारेट जंगलात कळत-नकळत टाकून देत असल्याने वणवे लागण्याचा घटना घडतात. सध्या या ठिकाणी जंगलातील बराचसा भाग वनपट्टेधारकांना जमीन कसण्यासाठी दिला आहे, शेतीची राबणी करतानाही वणवे लागतात. तसेच विशेषतः जंगलातील ससे, रान डुक्कर, भेकर, रानकोबड्या यांना पकडण्यासाठी शिकारी वणवे लावतात. त्यामुळे वणवे आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचारी हतबल झालेले दिसून येत आहेत.

साग वृक्षाची जंगले नष्ट
भिवंडी तालुका हा निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला व येथील भव्य वनसंपत्तीने बहरलेला, नटलेला आहे. एकेकाळी रोम देशात बोटी बांधण्यासाठी येथील साग मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात असे, सागाचे लाकूड इमारती व फर्निचरसाठी प्रसिद्ध आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याला लागूनच असलेल्या नजिकचा वाडा तालुका हा साग या वृक्षासाठी प्रसिद्ध आहे; मात्र आता वाढती जंगलतोड व वणव्यांमुळे येथील वनसंपत्ती नाश होताना दिसत आहे.

बहुतेक ठिकाणी न केलेली वृक्ष लागवड वणव्यात पेटून नष्ट झाली, हे दाखविण्यासाठीही वन कर्मचारी यांच्याकडून वणवे लावले जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमींकडून केला जातो. मात्र अशा वृक्षलागवडीच्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेही अद्याप असा वणवा लागलेला नाही.
- जगदीश एस. पाटील, वन क्षेत्रपाल, वारेट प्रकल्प

होळीनंतर वन हद्दीत वनपाल, गार्ड, मुकादम यांची गस्ती वाढवली आहे; मात्र एक ससा व रानडुकराच्या शिकारीसाठी अज्ञात व्यक्तीकडून या आगी लावल्या जात आहेत; मात्र लवकर त्यांचा बंदोबस्त केला जाईल.
- पूजा रक्ताते, वनपरिक्षेत्र अधिकारी, भिवंडी

वणवे लागलेच तर सर्वांनीच मदतीसाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाने लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, वन कर्मचारी आणि निसर्गप्रेमी यांच्या संयुक्त प्रयत्नाने अनेकदा वणवे आटोक्यात येऊ शकतात. यासाठी अशा लोकांची स्वतंत्र पथके तयार करण्याची गरज आहे.
- दीपक पुजारी, निसर्गप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com