सकाळी नऊच्या घंटेला संस्थाचालकांचा विरोध

सकाळी नऊच्या घंटेला संस्थाचालकांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः प्लेस्कूल, नर्सरी, केजीपासून ते चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊनंतर सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे काही शाळांतील खासगी शिकवण्या आणि इतर कामकाजाचे तर काही शिक्षकांचेही गणित बिघणार असल्याने या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा असल्याचे मत समुपदेशक, मनोविश्लेषक, शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
मुंबईसह राज्यात सकाळच्या सत्रात पूर्वप्राथमिकच्या शाळा या सकाळी सात ते आठच्या दरम्यान भरतात. त्यासाठी मुलांना सकाळी सहापूर्वीच उठून तयारी करावी लागत असल्याने त्यांच्या झोपेचे आणि त्यांच्या पालकांचे आरोग्य विचारात घेऊन शालेय शिक्षण विभागाने ८ फेब्रुवारी रोजी पूर्वप्राथमिक आणि चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर सुरू करण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे राज्यातील पालकांसोबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले होते; मात्र आता काही संस्थाचालक आणि खासगी शिकवण्या आणि इतर व्यवसायात गुंतलेल्या ठराविक शिक्षकांचे गणित बिघडणार असल्याने या निर्णयाला विरोध सुरू केल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे सकाळच्या सत्रात वाहतुकीचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता काही पालकांनी वर्तवली; तर सध्याच्या प्रचलित वेळा सुरूच ठेवण्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले आहे.
….
विद्यार्थी हिताला प्राधान्य हवे
मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार केला असता प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ नऊनंतर करणे हे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याचे मत शिक्षक समुपदेशक असलेले जयवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्यास होणाऱ्या विरोधाची कारणे तपासून पाहिल्यास त्यामागे काही अशैक्षणिक आणि अन्य व्यवसायिक हेतू कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध दुखावले जाण्याने निर्णयाविरोधी भूमिका कोणी घेत असेल, तर त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थी हितास प्राधान्य देण्याची गरज कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
…..
देशभरात काय सुरू आहे?
राज्यातील व देशातील एकूण शाळांचा विचार केल्यास माध्यमिक इयत्तांचे वर्ग हे सकाळ सत्रात; तर प्राथमिक वर्ग दुपार किंवा मध्यम सत्रात भरविल्याचे स्पष्ट लक्षात येईल. मुलांच्या अध्ययनास पोषक अशा शारीरिक, मानसिक स्थितीचा वयोगट आणि वेळेशी संबंध जोडल्यास नव्याने घेतलेल्या शासन निर्णयाचे निश्चितच स्वागत होणे गरजेचे असल्याचे मत जयवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
--
पूर्वप्राथमिकच्या शाळा या सकाळी सात आणि त्या दरम्यान भरत असतात, त्यासाठी मुलांना सकाळी सहा वाजताच उठून तयारी करावी लागते. यामुळे त्यांची आणि पालकांचीही झोपमोड आदी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. शिक्षण विभागाने या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला. शिवाय ज्या शाळांना ही वेळ पाळणे शक्य नाही, त्यांना संबंधित शिक्षणाधिकाऱ्यामार्फत सवलत घेता येणार आहे.
- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
--
मुंबईतील शाळांची संख्या
पालिका पूर्वप्राथमिक शाळा : १,०३५
प्राथमिक शाळा - ९५८
माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा - १,७३१
माध्यमिक शाळा- १,११७
उच्च माध्यमिक- ६१४
--
निर्णय घेण्यामागची कारणे
- मुंबईत पावसाळा आणि हिवाळ्यात सकाळी लवकर शाळेत गेल्याने आरोग्याचे प्रश्न
- विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या तक्रारी
- सकाळी पाल्यांना शाळेत सोडताना पालकांची ओढाताण होते.
- मुलांची झोप पूर्ण होत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com