बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हवे उद्योग

बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हवे उद्योग

संदीप साळवे : सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. २८ : सरकार व प्रशासनाचे भक्कम विकासाचे धोरण नसल्याने येथील मजुरांना स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे या भागात शिक्षण, आरोग्य व स्वयंरोजगार वाढीच्या शाश्वत योजना राबवून विकास करावा. बेरोजगारी वाढत असल्याने आगामी सरकारने नवे उद्योग आणून प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी व तरुणाई करत आहे.

दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असतो; मात्र पाणी साठवणुकीची ठोस उपाययोजना नसल्याने जानेवारीपासूनच जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातील विहीर व बोअरवेलला पाणी राहत नाही. यावर मात करण्यासाठी उपयुक्त प्रकल्पाची आवश्यकता आहे. यामुळे शेतीला गती येऊन जोडधंदे वाढीस चालना मिळण्यास हातभार लागेल. सध्या पालघर जिल्ह्यात प्रकल्पाची संख्या कमी आहे. जिल्ह्याच्या तुलनेत जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यात सिंचनाचा अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी मुबलक पाणी मिळत नाही. ज्यांच्याकडे विहिरी, बोअर आहे, त्यांना काही प्रमाणात पाणी मिळते. परंतु, कडक उन्हाळ्यात जलस्रोत कोरडेठाक पडतात. अस्मानी संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवला तरी त्याला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रकल्पांची संख्या, शेतमालाला अधिकाधिक भाव, तरुणांसाठी रोजगार या विषयावर लोकप्रतिनिधींनी बोलणे गरजेचे आहे. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शेतकरी, तरुणाई करत आहेत.


जव्हार तालुक्यातील अनेक गावांत माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना तालुका किंवा जिल्हास्तरावर पुढील शिक्षणासाठी जावे लागते. यामध्ये मुलींच्या पुढील उच्च शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळे तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय होणे गरजेचे आहे.
- सय्यद अतिक कोतवाल, जव्हार पर्यटन मोहीम

गावागावांमध्ये वाढत चाललेली बेरोजगारी चिंतेचा विषय झाला आहे. रोजगारासाठी तरुण शहराकडे धाव घेत आहे. यासाठी गावपातळीवर शेतीला पूरक असा दूध संकलन, कुक्कुटपालन, शेळीपालन व इतर व्यवसायासाठी शंभर टक्के अनुदान देऊन उपाययोजना कराव्यात.
- सुनील जाबर, सामाजिक कार्यकर्ते, विक्रमगड

ग्रामीण भागात असलेल्या विहिरी, शेत तलाव, बोअरवेल हे शेती सिंचनाचे मुख्य स्रोत आहेत. असे स्त्रोत वाढवून येथील शेती व त्यावर आधारित उद्योग उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. कृषी व मृद संधारण विभागाने विकसित योजना आखून येथील प्रगती साधली पाहिजे.
- ॲड. प्रदीप कामडी, ठाणे

जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुका परिसरात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. जिरायत शेतीचे अधिक प्रमाण असल्याने पावसावर अवलंबून राहावे लागते. परिसरात सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी नद्यांवर बंधारे करून पाणी अडवणे गरजेचे आहे.
- सोमनाथ टोकरे, सामाजिक कार्यकर्ते, पालघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com