लक्ष मतदानाच्या जोगव्याकडे

लक्ष मतदानाच्या जोगव्याकडे

वसई, ता. २८ (बातमीदार) : पालघर लोकसभा मतदानाला २१ दिवस शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. यातील नामनिर्देशन पत्र छाननीत कोण बाद होणार, किती उमेदवार माघार घेणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष तर राहणार आहे; मात्र मतदारांकडे जोगवा मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवार आणि त्या पक्षाकडून विकासाचा अजेंडा काय असेल, याची प्रतीक्षा मतदारांना लागली आहे.
काही पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. तसेच, चिन्हदेखील समोर आलेले नाही. यामुळे निवडणुकीत किती उमेदवार उभे राहणार, हे चित्र स्पष्ट झाले नाही. केवळ बहुजन विकास आघाडीतून विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचेही कोणतेच शक्तिप्रदर्शन झाले नाही. सकाळी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत हा अर्ज दाखल करण्यात आला. काही दिवस शिल्लक असतानाही निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली नाही. प्रचार, जाहीर सभा आणि विकासाचे मुद्दे समोर आले नाहीत.
पालघर मतदारसंघात पाण्याची समस्या भेडसावत आहे. तसेच, आरोग्य आणि शैक्षणिक बाबतीतही काही प्रमाणात समस्या आहेत. अनेक विद्यार्थी पायपीट करून शिक्षणासाठी दूरचा प्रवास करतात. मुख्य रस्ते गावांशी जोडणे; तसेच वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करणे, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्त्यांचा अभाव चाकरमानी वर्गाला, आरोग्य यंत्रणेला आव्हान ठरत असते. अशा विविध समस्यांनी ग्रासलेले पालघर लोकसभा मतदारसंघातील नागरिक आगामी सरकारकडे आशेने पाहत आहेत. लोकसभा निवडणूक होणार असल्याने अशा वेळी मतदारांकडे जोगवा मागण्यासाठी येणारा उमेदवार आणि पक्ष कोणती आश्वासने देणार, याकडे लक्ष लागणार आहे.
---------------------

जाहीरनामा, वचननाम्यात काय दडलंय?
उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिल्यावर विकासाच्या दिशेने पालघरला कसे सक्षम केले जाणार, कोणते मुद्दे असावेत, नव्या विकासाच्या घोषणा, समस्यांचे निराकरण कसे केले जाईल, यांसह विविध मुद्दे जाहीरनामा आणि वचननाम्यातून पुढे येणार आहेत. त्यासाठी त्या त्या पक्षाकडून मुद्देही काढले जाऊ लागले आहेत. यात केलेल्या कामाचाही उल्लेख असू शकतो. त्यामुळे नेमके कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या जाहीरनाम्यात काय दडले असेल, हेदेखील स्पष्ट होणार आहे.
-------------------
वाढवण बंदराचा मुद्दा प्रचारात
डहाणू येथील वाढवण बंदर प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या सभेत वाढवण बंदराचा मुद्दा घेतला होता आणि आम्ही नागरिकांसोबत आहोत, असे स्पष्ट केले. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदराला सर्वांत पहिला विरोध आमच्या बविआने केल्याचे सांगितले. त्यामुळे निवडणुकीत प्रचारावेळी वाढवण बंदर मुद्दा दिसून येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com