शाळा फीवाढबाबत शाळांना पालिकेच्‍या सूचना

शाळा फीवाढबाबत शाळांना पालिकेच्‍या सूचना

शाळा प्रवेश शुल्काबाबत शाळांना पालिकेच्‍या सूचना
पालकांकडून शिक्षण मंडळाकडे तक्रारी दाखल
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) ः सध्या शैक्षणिक वर्षानुसार शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शाळांमध्ये फी वाढ हा सध्या महत्‍त्‍वाचा मुद्दा बनला आहे. त्‍यामुळे शाळेची फी वाढ करताना शिक्षक-पालक समितीच्या मंजुरीनेच निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट सूचना शाळा व्यवस्थापनांना महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली‍ आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२४ जूनपासून सुरू होणार असले तरी या वर्षीच्या शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, गणवेश घेण्यासाठी काही शाळांकडून सक्ती केली जात आहे; तर काही शाळांनी अवास्तव फी वाढ केली आहे. याबाबत अनेक पालकांच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांकडून जास्‍तीची फी आकारू नये, फी न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेचे दाखले न देणे, निकालपत्रक न देणे, परीक्षेस बसू न देणे, टोमणे मारणे, लायब्ररीमध्ये बसवून ठेवणे, हाकलून लावणे यांसारख्या प्रकारांनी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देऊ नये. पालकांना विशिष्ट दुकानातून गणवेश, पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करू नये. शाळेने कोणत्याही प्रकारचे ॲप घेण्यास पालकांना सक्ती करू नये. शाळेत शिक्षक-पालक संघाची स्थापना करावी. तसेच शिक्षक-पालक संघाची स्थापना करतेवेळी शिक्षण विभागातील प्रतिनिधी यांना बोलविण्यात यावे. संपूर्ण कार्यपद्धतीची व्‍हिडीओ शूटिंग करावी. नियुक्त केलेल्या सदस्यांची व कार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी शाळेच्या वेबसाईटवर व नोटीस बोर्डवर लावावी. नियमानुसार स्थापन केलेल्या शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारी समितीच्या मंजुरीने शाळेच्या फी शुल्क निश्चितीबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना करण्यात आल्‍या आहेत.
...................
आरटीई अंतर्गत नियामातील सूचना
- आरटीई अंतर्गत २५ टक्के नुसार प्रवेश झालेल्या बालकास मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश पुरविण्याची जबाबदारी शाळेची असेल, असे नमूद आहे. यानुसार मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश याबाबत कार्यवाही करावी.
- आरटीई अंतर्गत २५ टक्‍के प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये.
- इयत्ता १ ली ते ४ थीच्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेल्‍या विद्यार्थ्यांना ८ वी पर्यंत प्रवेश मोफत द्यावयाचा आहे.
.....................
कोट
पालकांच्या ज्या काही तक्रारी येत आहेत, त्यानुसार शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन त्यांनी करणे अपेक्षित आहे.
- अरुणा यादव, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com