चुकीच्या इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू ?
चुकीच्या इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू?
रुग्णालयाने आरोप फेटाळला
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः मानखुर्द येथे राहणारे आणि रक्तदाब वाढला म्हणून पालिकेच्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल झालेल्या विकास कांबळे यांचा गुरुवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकाने केला आहे; मात्र त्यांचे हे आरोप रुग्णालयाने फेटाळले आहेत. टिळकनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
‘विकास यांचा रक्तदाब वाढून अचानक तो २४०वर गेल्याने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला,’ असा आरोप मृत विकास यांचे भाऊ राकेश कांबळे यांनी केला आहे. नातेवाइकांनी उपचाराबाबत आक्षेप घेतल्याने रुग्णालयात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भारती राजुलवाल यांनी सांगितले की, आमच्या डॉक्टरांनी योग्य उपचार केले आहेत. मी स्वतः उपचाराबाबतची चौकशी केली आहे. तरीही नातेवाइकांच्या आरोपामुळे शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्याबाबत अहवाल आल्यानंतर योग्य कारण कळेल. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित डॉक्टरविरुद्ध एफआयआर दाखल होईपर्यंत कुटुंब मृतदेह घेणार नसल्याचे राकेश यांचे म्हणणे होते; मात्र सध्या शवविच्छेदन सुरू असून, वातावरण शांत असल्याची माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.