नेपाळमधील उद्रेक भारतासह जगासाठी धोक्याची घंटा
नेपाळमधील उद्रेक भारतासह आशियासाठी धोक्याची घंटा
इतिहासाचे भान नसलेली पिढी सरकारपासून तुटलेली
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : नेपाळमध्ये झालेला उद्रेक आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय अस्थिरता हा भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचा सूर बहुतांश आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा आहे. श्रीलंका, बांगलादेश त्यानंतर नेपाळमध्ये झालेला तरुणाईचा उठावामागे एक समान धागा आहे. नवी पिढी अर्थातच जनरेशन-झी अर्थातच नव्या पिढीचा राजकीय सत्तेपासूनचा विश्वास ढासळत चालल्याचा एक संदेश या घटनांमधून जात आहे. भारतासह अनेक देशासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जेन-झी अर्थातच जनरेशन-झी म्हणजे १९९५ नंतर जन्माला आलेली तरुणाई होय. ही पिढी देशाच्या अलीकडच्याही इतिहासाची साक्षीदार नाही. बांगलादेशात उठाव करणाऱ्यांना १९७१च्या युद्धाबद्दल फारशी माहिती नाही. नेपाळमधील राजेशाही ते लोकशाही या स्थित्यंतराची साक्षीदार ही पिढी नाही. त्यामुळे त्यांना इतिहासाशी घेणेदेणे नाही. त्यामुळे संसद, सर्वोच्च न्यायालयाची जाळपोळ करायला ते मागेपुढे करात नाहीत; मात्र ते धोकादायक असल्याचे हे आंतरराष्ट्रीय विश्लेषक सांगतात.
...
बोकाळलेला भ्रष्टाचार
तीन कोटी लोकसंख्येच्या नेपाळमध्ये बेरोजगारी दर १९ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रत्येक पाच व्यक्तीमागे चार व्यक्ती दारिद्ररेषेखाली येतात. गेल्या वर्षी नऊ लाख लोकांनी रोजगारासाठी देशाबाहेर पलायन केले आहे. नेपाळबाहेरून देशात येत असलेले उत्पन्न तिथल्या सकल उत्पादनाच्या २५ टक्के येते. त्यात देशात खूप भ्रष्टाचार बोकाळला आहे. बोइंग विमाने खरेदीपासून विमानतळ उभारणीपर्यंत कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशावर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढ्या ऐशोआरामात राहतील, असे चित्र निर्माण झाले होते.
...
भारतासाठी आव्हान
बांगलादेश उठाव झाल्यानंतर पंतप्रधान हसीना शेख हसीना या भारतात आल्या. त्यातून दोन देशांदरम्यानचे संबंध अधिकच बिघडले आहेत. त्याचप्रमाणे उद्या राजीनामा दिलेले पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे जर भारतात दाखल आले तर नेपाळमधील भारतविरोधी वातावरण अधिकच उग्र होऊ शकते. ही परिस्थिती भारताने संयमाने हाताळण्याची गरज आहे. नेपाळमधील भारतसमर्थक गटांना बरोबर ठेवणे गरजेचे आहे. ही दीर्घकालीन उपाययोजना आहे. कुठल्याही परिस्थितीत भारत सॉफ्ट टार्गेट होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचा बहुतांश आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
...
नेपाळमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामागे बोकाळलेला भ्रष्टाचार व जनतेप्रति उत्तरदायित्व नसणे अशी दोन मुख्य कारणे दिसतात. देशात बेरोजगारीचे प्रमाण जास्त असल्यामुळे नेपाळी युवकांमध्ये संताप धुमसत होता; मात्र ज्या सुनियोजित पद्धतीने हिंसाचार झाला ते नेपाळच्या एकंदरीत राजकीय, सामाजिक इतिहासाला सुसंगत नाही. उदाहरणार्थ संसद, शासकीय कार्यालयांची जाळपोळ, पंतप्रधानांच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हे सर्व बघता उठावामागे बाह्यशक्तीचा हात असण्याची शक्यता आहे.
- सुधींद्र कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
...
भारताचे शेजारी राष्ट्र विशेषत: दक्षिण आशियामध्ये सरकारप्रति लोकांचा विशेषतः युवकांचा विश्वास ढासळत चालला आहे. श्रीलंका, बांगलादेशनंतर आता नेपाळ हा एक पॅटर्न आहे. नेपाळमधील ताज्या घडामोडी आकस्मिक वाटत असल्या तरी गेल्या काही वर्षांपासून नेपाळमधील अस्थिरता बघता अशी परिस्थिती कधीतरी येणार हे स्पष्ट होते. पाकिस्तानमधील तरुणाई लष्करशाहीला विटली आहे. उद्या पकिस्तानमध्येही लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांच्याविरोधात तरुणाई रस्त्यावर आल्यास आश्चर्य वाटणार नाही.
- डॉ. अश्वनी कुमार, राजकीय विश्लेषक
...
नेपाळमध्ये सध्याचे राजकीय नेतृत्व तत्त्वनिष्ठ राहिलेले नाही. नेपाळमधील माओवादी पक्षाचे मुख्य लक्ष्य होते राजेशाही व नेपाळी काँग्रेस पक्ष संपवणे. राजेशाही संपल्यानंतर नेपाळी काँग्रेससोबत मिळून त्यांनी जेव्हा सत्ता स्थापन केली, त्या वेळी नेपाळी जनतेचा त्यांच्यावरून विश्वास उडाला. त्यामुळे नेपाळी नेते केवळ घराणेशाहीचा विचार करतात यावर लोकांचा विश्वास बसला. आता नवीन नेतृत्व अपेक्षापूर्ती किती करते, त्यावर नेपाळचे भविष्य अवलंबून असणार आहे.
- डॉ. अमिताभ गुप्ता, स्कूल ऑफ इंटरनॅशल स्टडीज, जेएनयू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.