मोठागाव रेल्वे फाटकाचा अडथळा दूर होणार

मोठागाव रेल्वे फाटकाचा अडथळा दूर होणार

Published on

डोंबिवली-ठाणे मार्गावरील कोंडी सुटणार
रेतीबंदर येथे चार पदरी उड्डाणपूल उभारणीसाठी निधी मंजूर
डोंबिवली, ता. १६ (बातमीदार) : डोंबिवली-ठाणे मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. दिवा-वसई रेल्वेमार्गावरील मोठागाव रेतीबंदर येथील रेल्वे फाटकामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेऊन येथे बहुप्रतीक्षित उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या १६८ कोटी रुपयांच्या निधीपैकी ८९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यामुळे रेतीबंदर रेल्वे फाटकाचा अडथळा दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डोंबिवली परिसरातून ठाणे व मुंबईकडे जाण्यासाठी आणि मुंबई-ठाण्यातून डोंबिवलीकडे येण्यासाठी माणकोली उड्डाणपूल हा कमी अंतराचा मार्ग आहे. खासगी वाहनधारक, नोकरदारवर्ग, वाहनचालक या मार्गाला अधिक पसंती देतात. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या पुलावर अवजड वाहनांना बंदी असली तरीही वाहनसंख्या मोठी आहे. अशात, मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटक बंद असल्यास दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक वेळा वाहनांच्या रांगा माणकोली पुलापर्यंत पोहोचतात. परिणामी, पुलावर आणि दीनदयाळ रस्ता व रेतीबंदर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. ही कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना पोहोच रस्त्यांची कामे केली जाणार असून, या कामी सुमारे ६०० नागरिक बाधित होणार आहेत. बाधित नागरिकांचे भूसंपादन व पुनर्वसनासाठी सरकारने एकूण १३० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.

चार पदरी पुलाला मिळाली मंजुरी
भविष्यात या मार्गावरील वाहनसंख्या वाढणार असल्याने, रेल्वे फाटकावरील हा उड्डाणपूल दोन पदरीऐवजी चार पदरी असावा, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन आणि भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. सुरुवातीला रेल्वे प्रशासन दोन पदरी पुलावर ठाम असले तरी, पालिका प्रशासनाने भविष्यातील वाहतूक वाढीचे महत्त्व पटवून दिले. अखेर रेल्वे प्रशासनाने या चार पदरी उड्डाणपुलाला मंजुरी दिली आहे. या निधी मंजुरीमुळे डोंबिवली परिसराची वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे.

निधी महापालिकेकडे वर्ग
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत १६८ कोटी रुपयांच्या एकूण निधीपैकी ८९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे, तर रेल्वेमार्गावरील चार पदरी उड्डाणपुलाची उभारणी रेल्वे बांधकाम विभागामार्फत केली जाणार असून, यासाठी महापालिकेकडून ३० कोटी रुपयांचा निधी रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com