धुळीने झाकोळला आंबेडकर चौक
धुळीने झाकोळला आंबेडकर चौक
कंत्राटदारावर कायदेशीर कारवाईची मागणी
कल्याण, ता. १ (बातमीदार) : देशाचा ७७ वा प्रजासत्ताकदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, कल्याण पूर्वेतील नेतीवली पत्रीपूल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर मात्र धूळ आणि घाणीच्या विळख्यात सापडला होता. या ऐतिहासिक महत्त्वाच्या दिवशीही प्रशासनाने या परिसराची स्वच्छता केली नसल्याने संताप व्यक्त होत असून, संबंधित स्वच्छता कंत्राटदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने यासंदर्भात सहाय्यक पोलिस आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. नेतीवली चौकातील चबुतरा आणि नामफलक धुळीने माखले असून, बेशिस्त नागरिकांनी थुंकल्यामुळे पान-गुटख्याचे डाग सर्वत्र दिसत आहेत. ज्या कंपनीला या परिसराच्या स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे, त्या कंपनीने प्रजासत्ताकदिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीही येथे स्वच्छता मोहीम राबवली नाही, असा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर, प्रशासनाला जाग आली. गुरुवारी (ता. २९) काही स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या बाटल्या आणि कापडाने गुटख्याचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही कार्यवाही केवळ ‘दिखावा’ असल्याची टीका होत आहे.
अशा प्रकारे हाताने डाग पुसून चौक स्वच्छ होणार नाही. प्रशासनाने आधुनिक यंत्रणांचा आणि पाण्याचा वापर करून संपूर्ण चौक परिसर धुवून काढावा आणि विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरेश इंगळे यांनी केली. दोषींवर कारवाईची मागणी याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकारी आणि स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या खासगी कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजकीय व सामाजिक स्तरातून होत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

