कल्याण परिमंडळात  गुढीपाडवा उत्सव शांततेत

कल्याण परिमंडळात गुढीपाडवा उत्सव शांततेत

Published on

कल्याण-डोंबिवलीत गुढीपाडवा निर्विघ्न
६०० हून अधिक पोलिसांचा खडा पहारा
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कल्याण आणि डोंबिवली शहरांत निघालेल्या भव्य शोभायात्रा आणि गुढीपाडव्याचा उत्सव यंदा अत्यंत शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडला. पोलिस परिमंडळ ३ च्या वतीने राबविण्यात आलेला विशेष ‘ॲक्शन प्लॅन’ यशस्वी ठरला असून, ६०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली दोन्ही शहरांतील उत्सवाचा समारोप झाला.

पोलिस उपायुक्तांच्या थेट मार्गदर्शनाखाली आखण्यात आलेल्या या बंदोबस्तात अधिकाऱ्यांपासून ते गृहरक्षकांपर्यंत सर्वांनीच महत्त्वाची भूमिका बजावली. १९ पोलिस निरीक्षक, ६१ सहाय्यक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक आणि ५३८ पुरुष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात होता. ७२ पुरुष व नऊ महिला होमगार्डसह एसआरपीएफच्या दोन तुकड्या मुख्य शोभायात्रांच्या मार्गावर लक्ष ठेवून होत्या. मानपाडा पोलिस ठाणे क्षेत्रात सर्वाधिक ७० कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

राखीव दलाची सज्जता
कल्याणमधील महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी आणि डोंबिवलीतील विष्णुनगर या संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची विशेष गस्त होती. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ‘स्ट्रायकिंग फोर्स’ सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या सहकार्यामुळे संपूर्ण उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

नागरिकांकडून कौतुक
स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी बाहेरून तीन अधिकारी आणि १३७ कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्यात आले होते. या चोख नियोजनामुळे लाखो भाविक आणि शोभायात्रेतील सहभागी नागरिकांना सुरक्षितपणे उत्सवाचा आनंद घेता आला. शिस्तबद्ध बंदोबस्ताबद्दल पोलिस प्रशासनाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com