रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी उभारी मिळणार  

रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी उभारी मिळणार  


अलिबाग : राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांतील रेस्टॉरंट आणि हॉटेल सुरू करण्यास पर्यटन संचालनालयाने परवानगी दिली आहे. सागरी पर्यटन, धार्मिक स्थळे आदीमुळे पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यासाठी हा निर्णय उभारी देणारा ठरणार आहे, असा विश्‍वास जिल्ह्यातील व्यावसायिकांनी केला आहे. सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल बुकिंग वाढले असून सध्या 60 टक्के झाले आहे. दरम्यान, पर्यटन व्यवासायातून जिल्ह्यात दरवर्षी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते. 

रायगड किल्ला, थंड हवेचे ठिकाण माथेरान, विस्तीर्ण समुद्र किनारे आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळे यामुळे रायगड जिल्हा राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. मुंबई आणि पुण्याच्या शेजारचा जिल्हा असल्याने या दोन्ही महानगरांतील पर्यटक आठवडा अखेरच्या सहलीसाठी पहिली पसंती देतात. त्यामुळे या ठिकाणी पर्यटन बहरले आहे. "मिशन बिगीन अगेन' सुरू झाल्यापासून पर्यटक हॉटेल व्यवसायिकांकडे चौकशी करत होते. परंतु राज्य सरकारच्या बंदीमुळे ते सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. आता पर्यटन संचालनालयाने रेस्टॉरंट आणि हॉटेलसाठी काही नियम आणि अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या सुमारे सात महिन्यांपासून ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय पुन्हा उभारी घेईल, असा विश्‍वास व्यवायिकांना वाटत आहे. 


हे वाचा : शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणारे तोंडावर आपटले

जिल्ह्यात येणारे पर्यटक हे प्रामुख्याने मासे आणि अन्य मांसाहारी जेवणाला पसंती देतात. त्यातच आगरी, कोळी पद्धतीचे झणझणीत मांसाहाराला प्राधान्य असते. त्यामुळे मोठ्या हॉटेलबरोबरच लहान हॉटेल, टपरी व्यवसायही सुरू होणार आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची कटिबद्धता व्यक्त करतानाच उद्यापासून सुरू पर्यटक संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याने तयारी सुरू केली आहे. 


भाऊचा धक्का येथे रो-रो बोटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जाते. प्रवासादरम्यान मास्क लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंचे पालन केले जाते. कोरोनादरम्यान आरोग्याबाबत प्रवासी पर्यटन सावधानता बाळगत आहेत. यासाठी स्वत:ची वाहने घेऊन पर्यटन करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. 
- हाशिम मोंगीया, संचालक, एम 2 एम फेरीबोट सर्व्हीसेस. 

कोरोनामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधून यापूर्वी पार्सल देण्यात येत होती. आता उद्यापासून हॉटेलमध्ये बसून पर्यटकांना गरमागरम अन्नपदार्थांचा स्वाद चाखता येणार आहे. त्याचबरोबर मुंबई, पुण्यातील पर्यटकांकडून रुमसाठी बुकिंग होत आहेत. या बुकिंगची सरासरी 60 टक्के इतकी आहे. फक्त यासाठी डिस्काऊंड जास्त द्यावे लागत आहे. त्याचबरोबर बुकिंग करताना हॉटेलमधील आरोग्याची खबरदारी कशाप्रकारे घेतली जाते याची विचारणा केली जाते. 
- गिरीष मोटा, मालक, हॉटेल सी व्ही- अलिबाग. 

लॉकडाऊनचा मानसिक ताण कमी करण्यासाठी लॉंचने सकाळीच अलिबाग येथे मैत्रिणींबरोबर आलो आहोत. येथील हॉटेलस बंद असल्याने आरोग्याची काळजी म्हणून घरातूनच वेगवेगळे पदार्थ करून आणले आहेत. पाण्याची बाटल्यादेखील घरूनच आणल्या आहेत. उद्यापासून नियमावलीमध्ये सुरू होत असलेल्या हॉटेलमुळे ही कसरत करावी लागणार नाही. त्याचबरोबर येथील लज्जतदार अन्नपदार्थांची चव चाखता येणार आहे. 
- सायली देशपांडे, पर्यटक, दादर-मुंबई. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com