मुंबईकरांची खड्डेकोंडी

मुंबईकरांची खड्डेकोंडी

मुंबई - बुधवारी दिवसभर आकाशात काळे ढग दाटून आले असले, तरी पावसाने मुंबईला हूलच दिली. आर्द्रता जास्त असल्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे नोकरदारांचे हाल झाले. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडीमुळे दक्षिण मुंबईतून उपनगरांत जाण्यासाठी दुप्पट वेळ लागत होता. सकाळी १०.४६ आणि सायंकाळी ७.३५ दरम्यान सर्वाधिक वाहतूक कोंडी झाली होती. मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक राबवल्यामुळे प्रवाशांच्या हालात भरच पडली. 

हवामान विभागाने बुधवारीही मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकानुसार ३० टक्के कमी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. मुख्य आणि हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांत सकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे एल्फिन्स्टन रोडसारखी चेंगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे मध्य रेल्वेने दुपारी नियमित वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यास सुरवात केली; मात्र तोपर्यंत प्रवाशांचे नाहक हाल झाले.

उपनगरांतून शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्‍चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे हे दोन्ही रस्ते निम्मे अडल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गांवरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहतुकीची गती मंदावली होती. नेहमीचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना दुप्पट वेळ लागत होता. 

वाहतूक कोंडी नेहमीप्रमाणेच होती. रस्त्यांवर काही  ठिकाणी अडथळे होते. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिस रस्त्यांवर होते. 
- एस. भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

आर्द्रता ९५ टक्‍क्‍यांवर
मुंबईत दिवसभर ढग दाटून आले होते; मात्र पाऊस झालाच नाही. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे २.६ मिमी आणि सांताक्रूझ येथे ४.१ मिमी पावसाची नोंद झाली. आर्द्रता ९५ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याने दुपारी नागरिक घामाघूम झाले होते. 

रस्त्यावरील खड्ड्यांत रोपांची लागवड
दोन दिवस झालेल्या पावसात मुंबई तुंबल्यामुळे महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीका होत आहे. बुधवारी जोगेश्‍वरी येथे रस्त्यावरील खड्ड्यांत रोपे लावून शिवसेना आणि महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष अजित साळुंखे यांनी हा उपक्रम राबवला. जोगेश्‍वरी पूर्वेकडील मेघवाडी येथील शिवसेनेच्या शाखेलगतच्या रस्त्यावरील खड्ड्यांत रोपे लावण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com