'तुकाराम मुंढे हे राज्यातील सर्वात अपयशी अधिकारी'; भाजप आमदाराची घणाघाती टीका

'तुकाराम मुंढे हे राज्यातील सर्वात अपयशी अधिकारी'; भाजप आमदाराची घणाघाती टीका

नवी मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांपैकी तुकाराम मुंढे हे सर्वात अपयशी ठरलेले अधिकारी आहेत. त्यांनी केलेली प्रत्येक कारवाई ही प्रसिद्धीसाठीच केलेली कारवाई असते, अशा शब्दांत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढेंवर तोफ डागली आहे. मुंढे कसे आहेत याबाबत कोणाला माहिती घ्यायची असेल तर त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटावे असे जाहीर आवाहनही म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केले.    

नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या राज्यातील पहिल्या अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रश्न मांडण्यासाठी म्हात्रे यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यादरम्यान बोलताना म्हात्रे यांनी मुंढे यांचा खरपूस समाचार घेतला. जेव्हा मुंढे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. तेव्हा त्यांची आणि माझी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. चर्चेदरम्यान त्यांची भूमिका नेहमी नकारात्मकच राहीलेली आहे. यादरम्यान वाद एवढ्या विकोपाला जायचा की ते सर्वांना फोन करून स्वतःला बंदोबस्त वगैरे मागवून घेत. जणूकाही आम्ही चर्चा नाही त्यांच्यावर हल्ला करायला आलो आहोत. असे म्हात्रे यांनी सांगितले. मुंढेंबद्दल सांगताना म्हात्रे म्हणाल्या की, ते लोकप्रतिनिधींना एकाच चष्म्यातून पाहायचे, त्यांना सर्व लोकप्रतिनिधी चोर वाटतात. म्हणून त्यांना मी एकेदिवस बोलले, तुमच्या डोळ्यावर लावलेला काळा चष्णा बदलवून घ्या, काळ्याऐवजी सफेद चष्म्यातून आमच्याकडे पाहा. मग समजेल तुम्हाला लोकप्रतिनिधी कोण आहेत ते.

तुकाराम मुंढे राज्यातील ज्या-ज्या महापालिकेत गेले, तिकडे ते अपयशी ठरले. पूर्ण महाराष्ट्रात ते फेल ठरलेले अधिकारी आहेत, असा दावा म्हात्रे यांनी केला. मुंढे नेहमी सतत प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न  करतात. ते नेहमी ब्रेकींग न्यूजच्या हव्यासात असायचे, एक कर्मचारी देखील निलंबित केला तरी त्यांना ब्रेकींग न्यूज हवी होती, त्यामुळे ते ज्या पालिकेत गेले तिकडे अपयशी ठरले आहेत. वॉक विथ कमिशनरमध्ये मुंढेंकडे नागरीकांनी मागणी केलेल्या कामांना पूर्णत्वास नेले नाहीत. समाजमाध्यमांवर एखादे समुह तयार करायचे, स्वतःवर फुले टाकायला लोकांना सांगायचे, निवडक लोकांना सोबत घेऊन स्वतःचे कौतूक करून घ्यायचे आसा आरोपही म्हात्रे यांनी मुंढेंवर केला. सरकारने केंद्र ऐवजी शाळा असे परिपत्रक काढल्यामुळे ज्या केंद्राला वाचवण्यासाठी मुंढेंनी आटापीटा केला होता. त्यांना चपराक बसल्याचा पुनरुच्चारही म्हात्रे यांनी केला.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com