
मुंबईत योगी सरकारचं कार्यालय; राज ठाकरेंच्या भूमिकेचे पडसाद?
मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. एकीकडे राज यांच्या परप्रांतिय विरोधी भूमिकेमुळे त्यांना उत्तर प्रदेशात होणारा विरोध वाढत असतानाच योगी सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतल्या उत्तर भारतीय नागरिकांचे नोकरी आणि व्यवसायासंदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा; मनसेच्या गोटात घडामोडींना वेग
दरम्यान, उत्तर प्रदेशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध होत आहे. काही वर्षांपासून राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याचेच पडसाद आता उत्तर प्रदेशात उमटू लागले आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेमुळे राजकीय गोटात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
हेही वाचा: ''राज ठाकरे दबंग नव्हे उंदीर'', उत्तर प्रदेशातील भाजप नेत्याची टीका
मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय राहतात. योगी सरकारच्या या कार्यालयामुळे मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना राज्य सरकारचे लाभ घेता येणार आहेत. उत्तर भारतातले पण मुंबई राहणारे मोठे गुंतवणूकदार, ज्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय मजुरांसाठीही योजना तयार करण्यात आल्या आहेत. जेव्हा या मजुरांना परत उत्तर प्रदेशात यायचं असेल तेव्हा त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
लॉकडाऊनच्या काळात उत्तर भारतीयांना जी पायपीट करावी लागली, त्याच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय उभारण्यात आलं आहे. आता या निर्णयाचे राजकीय पडसाद काय उमटतात, याकडे लक्ष लागून आहे.
Web Title: Uttar Pradesh Government Office In Mumbai Says Yogi Adityanath Ahead Of Raj Thackeray Visit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..