Vidhansabha 2019 : युतीसमोर आव्हान आघाडी, मनसेचे!

North-Mumbai-Constituency
North-Mumbai-Constituency

शिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीप्रमाणे आघाडी झाल्यास आणि ‘मनसे’ची त्यांना साथ मिळाल्यास युतीसमोर आव्हान उभे राहील.

उत्तर मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागांपैकी केवळ मागठाणे मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला होता. मालाडमध्ये काँग्रेस तर दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि चारकोपमध्ये भाजपचे आमदार निवडून आले; मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीची घोषणा करताना विधानसभेसाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’चा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार तीन जागा मिळणार असतील, तर दहिसर आणि मालाडच्या जागेबाबत शिवसेना आशावादी आहे. खरे पाहता, दहिसर हा शिवसेनेचा गड मानला जातो. विनोद घोसाळकर यांनी बांधलेला हा मतदारसंघ त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक आणि सून व नगरसेविका तेजस्वी यांनी तशाच ताकदीने तो सांभाळला. खुद्द विनोद घोसाळकर आता ‘म्हाडा’चे सभापती झाल्याने ते अद्याप विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत आहेत; दहिसरमधून रिंगणात उतरण्याची त्यांची इच्छा आहे. सध्या भाजपच्या मनीषा चौधरी दहिसरच्या आमदार आहेत. त्यांच्याबद्दल काहीशी नाराजीही आहे.  

बोरिवली, चारकोप आणि कांदिवलीतून अनुक्रमे शिक्षणमंत्री विनोद तावडे, योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांना भाजपची उमेदवारी मिळवण्यात फारशी अडचण येणार नाही. मागील निवडणुकीत मागठाणेतून ‘मनसे’चे प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेने पराभव केला होता. नंतर भाजपने त्यांना आपल्या तंबूत ओढले; मात्र युती कायम राहिल्यास येथून शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता अधिक दिसते.

मालाड हा तिसरा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला जाण्याची शक्‍यता आहे. येथे मागील निवडणुकीत भाजपला थोडक्‍या मतांनी पराभूत व्हावे लागले होते. आता युती झाल्यास भाजप चांगली लढत देऊ शकेल. मुस्लिम मतदार अधिक असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाऊ शकतो. 

‘मनसे’चे प्रवीण दरेकर आणि काँग्रेसचे राजहंस सिंह भाजपवासी झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रकाश सुर्वे शिवसेनेत गेले. बोरिवलीत २००४ मध्ये काँग्रेसला एक लाख मते होती, तर २०१४ मध्ये काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. याचवेळी राष्ट्रवादीच्या इंद्रपाल सिंह यांना अवघ्या ११९० मतांवर थांबावे लागले. चारकोपला काँग्रेसचे भरत पारेख सलग दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाले होते, ‘मनसे’च्या दीपक देसाई यांची मते २३ हजारांवरून पाच हजारांवर आली. २००९ मध्ये कांदिवलीचे आमदार झालेले काँग्रेसचे ठाकूर रमेश सिंह यांना २०१४ मध्ये पराभव पत्करावा लागला. आता, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेची युती झाली, तर किती प्रभाव पडेल हा चर्चेचा विषय आहे.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक
शिवसेना - विनोद घोसाळकर, प्रकाश सुर्वे, दीपक पवार.

भाजप - विनोद तावडे, मनीषा चौधरी, प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर, अतुल भातखळकर, योगेश सागर.

काँग्रेस - अस्लम शेख, संदेश कोंडविलकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com