मुंबई : भारताला भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने पाण्याचा मर्यादित वापर (रिड्यूस), पुनर्वापर (रियूज) आणि पुनर्प्रक्रिया (रिसायकल) या "थ्री-आर'ला महत्त्व देणे गरजेचे आहे. त्याची काटेकार अंमलबजवणी केल्यास भविष्यातील पाणीयुद्ध टाळणे शक्य असल्याचे मत संशोधक डॉ. जयंता बंद्योपाध्याय यांनी व्यक्त केले.
झेव्हियर्स महाविद्यालयाच्या मल्हार महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित "पाणीयुद्ध : भारताचे चिंताजनक भविष्य' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. 15) मल्हार महोत्सवाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मल्हारमध्ये देशातील विविध नामवंतांची व्याख्याने व चर्चासत्र झाली. या वेळी बंदोपाध्याय यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यथोचित मार्गदर्शन केले.
भारतामध्ये पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये धरणांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे "नर्मदा बचाओ आंदोलना'चे कार्यकर्ते श्रीपाद धर्माधिकारी यांनी विषद केले. सक्षम व भविष्याची गरज लक्षात घेऊन धरणे उभी केल्यास भारताला पाण्याचे व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल. शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी धरणांमुळे सहज उपलब्ध करता येऊ शकते. शेतीला योग्य पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांसमोरील समस्याही दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
"पाणीसमस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीवाटपाबाबत अनेक प्रश्न न्यालयालयात प्रलंबित आहेत; परंतु पाणीसमस्येचा प्रश्न निकालात काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. राजकारण्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांमधील समस्यांनुसार पाण्याचे वाटप करण्यास पुढाकार घेतल्यास हा प्रश्न सहज निकाली निघू शकतो,' असे मत पर्यावरणतज्ज्ञ चंद्रभूषण यांनी व्यक्त केले.
|