दमनगंगा, पिंजाळ, गारगाईचा आधार
मुंबई - मुंबईची वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण पाहता प्रस्तावित दमनगंगा, गारगाई व पिंजाळ हे तीन धरण प्रकल्प येत्या काही वर्षांत पूर्ण झाल्यास मुंबईकरांची 2051 पर्यंतची गरज भागेल, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत समाधानकारक पाऊस पडल्याने सर्व धरणे भरलेली आहेत. यामुळे यंदा पाण्याची चिंता भासणार नाही. वाढती लोकसंख्या, इमारतींची बांधकामे पाहता वाढती तहान भागविण्यासाठी पालिकेने दमनगंगा, पिंजाळ व गारगाई हे तीन पाणी प्रकल्प हाती घेऊन ते वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असे महापौर म्हणाले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत सध्या 12 लाख 41 हजार दशलक्ष लिटर इतका म्हणजे एकूण आवश्यक पाणीसाठ्याच्या 85 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती मुख्य जल अभियंता अशोक तवाडिया यांनी दिली.
प्रकल्पांची क्षमता (रोज)
- दमनगंगा : 1586 दशलक्ष लिटर
- पिंजाळ : 865 दशलक्ष लिटर
- गारगाई : 440 दशलक्ष लिटर
|