कसाऱ्यात चक्क विहीरच बुडाली पाण्यात 

कसाऱ्यात चक्क विहीरच बुडाली पाण्यात 

खर्डी : शहापुर तालुक्‍यातील कसारा खुर्द गाव हद्दीतील पाणी टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेतून ठोकरवाडी येथे बांधण्यात आलेली विहिर आश्‍चर्यकारक कोसळली आहे. आठ दिवसांपूर्वी आरसीसी रिंग फिरवून बांधकाम करण्यात आलेली विहीर टंचाईच्या झळा उद्‌भवत असताना पाण्याखाली बुडून दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. 

कसाराखुर्द गाव हद्दीतील ठोकरवाडी, पायरवाडी, सावरवाडी या तीन वस्त्यांची पाणीटंचाई दूर व्हावी, याकरिता सरकारस्तरावर जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विहिरीचे बांधकाम प्रस्तावित करून त्याचा आराखडा तयार करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी प्रत्यक्षात विहिरीच्या आरसीसी बांधकामाला सुरुवात करून ठेकेदाराने आठ दिवसात काम पूर्ण केले.

मात्र दोनच दिवसांनंतर नागरिकांचे लक्ष गेले असता विहिर चोरीला गेल्यासारखे चित्र नजरेस पडले. एखाद्या चित्रपटातील दृश्‍याप्रमाणे जणू काही विहीर हरवली असे चित्र निर्माण झाले होते. यावेळी प्रत्यक्ष पाहणी केली असता विहिरीचे बांधकाम कोसळून पूर्णपणे पाण्याखाली बुडाल्याचे दिसून आले. 

कंत्राटदाराने या कामात ग्रीट पावडर, हलक्‍या प्रतीचे आणि कमी जाडीची लोखंडी सळई, माती मिश्रीत रेती वापरून निकृष्ट दर्जाचे काम केले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने विहिरीच्या निकृष्ट कामाचा नमुना उघड झाला आहे. विहिरीच्या कामात वापरण्यात आलेल्या साहित्यांची स्थिती पहाता ती कधीही कोसळेल, अशी भीती ठेकेदाराच्या निदर्शनास आणून देत होतो, असे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले.

अखेर बुधवारी (ता. 29) दुपारी विहीर कोसळल्याने ऐन टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान कसारा खुर्द ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाला याबाबत कळवून लेखी पत्र देण्यात आल्याचे सांगितले. 

विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे आहे. ही बाब संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली. मात्र लक्ष न देता काम कसेबसे आटोपून घेतले. विहिर कोसळल्यानंतर कामाचा निकृष्ट दर्जा आपोआप उघड पडला आहे. 
-संदीप भांगले, सरपंच, 
कसारा खुर्द 

वास्तविक काम करून आठ दिवस झाले. ठेकेदाराने विहिरीच्या बाजूने जेसीबीच्या सहायाने माती ओढून भक्कमपणा देण्याचा प्रयत्न केला. कदाचित जेसीबीच्या धक्‍क्‍याने विहिरीची नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडून तळापासून पुन्हा नव्याने बांधकाम करून घेण्यात येईल. 
- एम. जी. आव्हाड, 
प्रभारी उपअभियंता 
पाणी पुरवठा विभाग 
पंचायत समिती शहापूर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com