वेतन दिल्याशिवाय हजर होणार नाही, जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर निर्णयावर ठाम

जिल्हा रुग्णालय इमारत.
जिल्हा रुग्णालय इमारत.

अलिबाग (बातमीदार) : येथील जिल्हा रुग्णालयात एनआरएचएमअंतर्गत काम करणाऱ्या विशेष डॉक्‍टरांचे दीड कोटी रुपयांचे मानधन सरकारने थकवले आहे. त्यामुळे या डॉक्‍टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या पाच दिवसांपासून विशेष डॉक्‍टरांची कमतरता रुग्णालयाला भेडसावत असल्याने रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईमध्ये हलवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. वेतन दिल्याशिवाय कामावर हजर होणार नाही, अशी डॉक्‍टरांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे रुग्णांना अजून रुग्ण सेवेपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे. 

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात एनआरएचएमअंतर्गत डॉ. मनोज कोळी, डॉ. महेंद्र घाटे, डॉ. मेघा घाटे, डॉ. सी. पी. पांडवकर, डॉ. कृष्णा बडगीरे, डॉ. राजेश्री बडगीरे, डॉ. अरुण गवळी, डॉ. अमृत माने, डॉ. अंकुश शिंदे, डॉ. चंद्रशेखर साठ्ये, डॉ. आरती कोळी या विशेष डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून हे डॉक्‍टर जिल्हा रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत. या डॉक्‍टरांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे वेतन सरकारने थकवले आहे. वारंवार पाठपुरावा करून सरकारकडून वेतन देण्याबाबत सकारात्मक भूमिका झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्‍टरांनी १४ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला पाच दिवस होत आले, तरी सरकारने डॉक्‍टरांच्या वेतन देण्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. डॉक्‍टर सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मात्र, त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य रुग्णांना होत आहे. 

सरकार आणि डॉक्‍टरांच्या या वादामध्ये सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. जोपर्यंत सरकार वेतन देण्याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशी ठाम भूमिका डॉक्‍टरांनी घेतली आहे. जिल्हा रुग्णालयात डॉक्‍टर नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलवण्याची वेळ आली आहे. त्यात काही शस्त्रक्रिया रखडल्या असून त्यांच्यावर उपचारही योग्य पद्धतीने होत नसल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाइकांकडून उमटत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वेतन देण्याबाबत, तसेच संपावर जाण्याबाबत निवेदन दिले आहे. जोपर्यंत वेतन मिळत नाही, तोपर्यंत कामावर हजर होणार नाही, हा आमचा निर्णय आहे.
- कंत्राटी डॉक्‍टर (नाव न सांगण्यावरून) 

जून २०१७ पासून मानधन मिळत नाही म्हणून डॉक्‍टरांनी गुरुवारपासून (ता. १४) बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. डॉक्‍टरांकडून सरकारने बंधपत्र करून घेतले असून, त्यामध्ये त्यांना संपावर जाता येणार नाही, अशी तरतूद आहे. त्यामुळे या कंत्राटी डॉक्‍टरांना सेवेतून कमी करून त्यांच्या ठिकाणी नवीन कंत्राटी डॉक्‍टरांची नेमणूक करावी. 
- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com