मुंबई - महिला सक्षमीकरणासाठी दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना महापालिकेने रिक्षासाठी 50 टक्के अर्थसाह्य करावे, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाच्या किमतीपैकी 50 टक्के रक्कम पालिकेने द्यावी, असे या सूचनेत म्हटले आहे.
मुंबईतील गरीब महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, यासाठी पालिका जेंडर बजेटच्या माध्यमातून महिला व बालकल्याण योजनेंतर्गत त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कौशल्य विकास साधण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत महिलांना व्यक्तिगत स्तरावर वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित महिलांना रिक्षासाठी पालिकेने 50 टक्के अर्थसाह्य करावे. महिलांना रिक्षाच्या किमतीपैकी 50 टक्के त्या भरतील व 50 टक्के पालिका देईल, या अटीवर रिक्षाचे वाटप करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी केली आहे.
|