मुंबई - कांजुरमार्ग येथे गॅसगळतीमुळे मंगळवारी (ता. 21) पहाटे भीषण आग लागून, सात कामगार जखमी झाले. महानगर गॅस पाईपलाईनमध्ये नवी जोडणी करताना ही दुर्घटना घडली.
कांजूरमार्गच्या गांधी सर्कल परिसरात महानगर गॅस कंपनीच्या वतीने नवीन जोडणीसाठी खोदकाम करताना गॅस पाईपलाईनमध्ये गळती झाली आणि आगीचा भडका उडला. त्यात रामसिंग राठोड, गजानन जाधव, गजानन पवार, मानस मेहनती, धर्मेंद्र रॉय, संदीप गौतम आणि इंजिनीअर अली हे गंभीर जखमी झाले. त्यांना घाटकोपरच्या राजावाडी आणि कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाने दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवली.
जखमींपैकी गजानन जाधव, गजानन पवार आणि अली यांना उपचार करून घरी सोडण्यात आले, तर रामसिंग राठोड, मानस मेहनती, धर्मेंद्र रॉय आणि संदीप गौतम हे 30 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
महानगर गॅस कंपनीने जोडणीचे काम एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
|