जागतिक मधुमेह दिन! जगात 50 दशलक्षहून अधिक लोक मधूमेहाने ग्रस्त

जागतिक मधुमेह दिन! जगात 50 दशलक्षहून अधिक लोक मधूमेहाने ग्रस्त

मुंबई : लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा अत्यंत जवळचा संबंध असून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही समस्या एकमेकांशी निगडित आहेत. भारतात मधुमेही रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून सध्या भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून संबोधले जात आहे. जगभरात 50 दशलक्षहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. 

यात टाईप-2 मधुमेह असणाऱ्या रूग्णांची संख्या प्रचंड आहे. टाईप- 2 मधुमेह होण्यामागील वाढत वजन हे मुख्य कारण आहे. ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त टाईप-2 मधुमेह होण्यापासून स्वतःला बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करून वजन वाढणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं डॉक्टर सांगत आहेत.

भारतात 90 टक्के रुग्णांना टाईप 2 मधूमेहाचा त्रास- 

गेल्या 30 वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून येत आहे. या बदलत्या काळात लोकांची जीवनशैली आणि आहाराच्या पद्धतीमध्येही बदल झाला आहे. अतिरिक्त जंडफुडचं सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणा वाढतोय. याव्यतिरिक्त पाश्चिमात्य लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे शरीरातील चरबीची टक्केवारी जास्त आहे. भारतातील लोकांच्या पोटात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना मधुमेह होण्याचा धोका असतो. भारतामध्ये मधुमेहाच्या 90 टक्के रूग्णांना टाइप- 2 प्रकारचा मधुमेह असतो. या रूग्णांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा आणि मधुमेह एकत्र आला, की व्यक्तीला खूप भूक लागते. गोड खाण्याची इच्छा होऊ लागते. अशा स्थितीत अतिलठ्ठपणामुळे आणखीन विविध आजारांना आपसुकच आमंत्रण मिळते असे अपोलो आणि ग्लोबल रूग्णालयाचे बेरिअँटिक अँण्ड लँप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले. 

लठ्ठपणा कसा ओळखावा?

लठ्ठपणाचे वर्गीकरण करण्यासाठी ‘बीएमआय’ अर्थातच ‘बॉडी मास इंडेक्स’चा वापर केला जातो. ते वजन आणि उंचीचे गुणोत्तर असते. बीएमआयचे गुणोत्तर 18:25 असेल, तर हे प्रकरण ‘नॉर्मल’ आहे. बीएमआय गुणोत्तर 25:30 असेल, तर जास्त वजन, 30:35  असेल तर ती व्यक्ती लठ्ठपणाच्या पहिल्या पायरीवर असते. हे गुणोत्तर 35:40 च्या पुढे असेल तर ती लठ्ठपणाच्या दुसऱ्या पायरीवर असते आणि 40 आणि त्यापुढे असेल तर गंभीर स्वरूपाचा लठ्ठपणा आहे, हे समजून घ्यावे. 
बीएमआय किंवा कमरेचा घेर वाढत जातो, तशा शरीरात अनेक व्याधी निर्माण होतात. लठ्ठपणा हा आजार अनुवांशिकही असू शकतो.

लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह हे दोन्ही इन्सुलिन रेजिस्टंसशी संबंधित आहे. मुळात, रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित झाल्यास मधुमेह होतो. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीरात आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत(ग्लुकोज)मध्ये रूपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या स्वादुपिंडामध्ये तयार झालेले इन्सुलिन शरीराच्या पेशींत साठवले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एक तर इन्सुलित तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. आवश्यकतेनुसार इन्सुलिन शरीरात तयार होत नसल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे मधुमेह होतो. मधुमेहाचे टाईप- 1 आणि टाईप -2 असे दोन प्रकार आहेत. यात टाइप-2 मधुमेहामध्ये स्वादुपिंडाचे इन्सुलिनचे उत्पादन सुरू असते. पण जेवढे इन्सुलिन तयार होत आहे ते पुरेसे नसते.

बदलती जीवनशैली, जंकफुड, घाईघाईनं खाणे, एका जागी बसून काम करणं आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारणं आहेत. यामुळे लठ्ठपणा वाढल्याने शरीरात इन्सुलिन बनताना अडथळा निर्माण होतो. परिणामी रक्तातील साखर वाढत राहते. भारतात लठ्ठ व्यक्तींची वाढती आकडेवारी लक्षात घेता 2030 च्या अखेरीस मधुमेहाने ग्रस्त रूग्णांची संख्या वाढून 87 दशलक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधुमेहाने पिडित रूग्णांमध्ये डोळ्यांची समस्या, हातापायांच्या नसा सुजणं, मूत्रपिंड विकार व हृदयविकारचा धोका वाढतो.

मधुमेहासह आयुष्य जगणं हे सोपं नाही. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आजीवन गोळ्या, आणि आहारात पथ्य पाळावे लागते. अनेक वर्षांपासून मधुमेह असल्यास आजारातील गुंतागुंत वाढून अन्य आजारही बळावू शकतात. टाईप- 2 मधुमेहात लठ्ठपणा हा कारणीभूत ठरतोय. त्यामुळे टाईप- 2 मधुमेह टाळण्यासाठी वजन वाढणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. परंतु, तरीही वजन कमी होत नसल्यानं अनेक जण निराश होऊन व्यायाम करत टाळतात. मात्र, तसं न करता दररोज न चुकता व्यायाम करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

टाईप- 2 मधुमेह कसा टाळावा ? 

टाईप- 2 मधुमेह होण्यापासून रोखण्यासाठी वजन वाढणार नाही, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. जीवनशैलीत बदल हे सर्व वजन कमी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रूग्णाचा बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल आणि त्याला टाईप-2 मधुमेह असेल तर मेटाबोलिक आणि बेरिअँट्रिक सर्जरी वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. विशेष म्हणजे, बेरिअँट्रिक आणि मेटाबोलिक शस्त्रक्रियेमुळे केवळ वजन कमी होत नाही तर बऱ्याच रूग्णांमध्ये टाईप-२ मधुमेही सुद्धा नियंत्रणात राहतो. कारण या शस्त्रक्रियेमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळवता येतं. सामान्यतः असे दिसून आले आहे की, मधुमेहाचे निदान होऊन जास्त कालावधी झालेला नसेल आणि स्वादुपिंडाचे कार्य उत्तम सुरू असल्यास अशा स्थितीत शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही महिन्यांत रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. बेरिअँट्रिक शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला मधुमेहाची औषध घेण्याची गरज कमी होते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) या संस्थेनं 2009 मध्ये टाईप-2 मधुमेहाच्या उपचारासाठी बेरिअँट्रिक आणि मेटाबोलिक शस्त्रक्रियेचा समावेश केला होता.

World Diabetes Day More than 50 million people in the world suffer from diabetes

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com