वरळी कोळीवाडा खरंच कोरोनामुक्त झालाय का?

worli koliwada
worli koliwada

मुंबई : वरळी कोळीवाड्यावर महिन्याभरापासून अधिक काळापासून असलेले निर्बंध आता उठविण्यात येत आहेत. मात्र, कोळीवाडा खरंच कोरोनामुक्त झाला का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. केवळ लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांची तपासणी केली जात असताना एखादा विभाग कारोना मुक्त झाल्याचे कसे निश्‍चित होऊ शकते. त्याचबरोबर वरळी कोळीवाड्यातील नगरसेविकेलाच या आठवड्यात कोरोनाचा बाधा झाली आहे.

ठराविक दिवसात रुग्ण न आढळल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध शिथील केल्या जातात. वरळी कोळीवाड्यातही याच निकषानुसार निर्बंध शिथील करण्यात येत आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. या भागातील नगरसेविका या शेवटच्या रुग्ण आहे. त्यांच्या कुटूंबाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. निर्बंध शिथील करण्यात येणार असेल तरी या भागातील तपासणी नियमित सुरु राहाणार आहे. पल्स ऑक्‍सीमिटरच्या मदतीने जेष्ठ नागरीकांची तपासणी सुरु असल्याचे महापौरांनी सांगितले.

29 एप्रिल रोजी कोळीवड्यात 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. आतापर्यंत 90 च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 53 जण कोरोनमुक्त झाले आहे. रुग्ण आढळल्यानंतर पहिल्याच दिवशी 45 हजाराची वस्ती असलेले वरळी कोळीवाडा महापालिकेने सील केले. कोळीवाड्याबरोबर शेजारच्या जिजामाता नगर आणि जनता कॉलनीतही रुग्ण आढळल्याने हा परिसरही सील करण्यात आला होता. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ तर आहेच, त्याचबरोबर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे वरळीतील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली होत होत्या. या वरळी पॅटर्नची स्तुती केंद्रीय पथकानेही केली होती .पण,आजही शहरातील सर्वात जास्त रुग्णांची नोंद वरळी प्रभादेवीच्या जी दक्षिण प्रभागात झाली आहे. महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्रभागनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी देणे बंद केल्यामुळे रुग्णांची निश्‍चित संख्या मिळू शकत नाही. मात्र, किमान हजाराच्यावर रुग्ण आता पर्यंत नोंदवले गेले असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, गेल्या सात दिवसात कोळीवाडा, आदर्श नगर, जनता कॉलनी येथे एकही रुग्ण आढळले नाही.

भाजपने महापालिकेच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी स्थानिक नगरसेविकेला कोरोना झाला आहे, मग ठराविक दिवसांत रुग्ण आढळला नाही, असा दावा कसा करतात, असे मुद्दा उपस्थित केला. एवढेच नाही तर त्यांनी वरळी परीसरात गरजूंनी दिल्या गेलेल्या तांदळाच्या दर्जावरही प्रश्‍न निर्माण केला आहे. या भागातील रेशनच्या दुकानांवर निकृष्ट दर्जाचे धान्य विकले जात असल्याचा आरोप करता हाच तो वरळी पॅटर्न अशा टोलाही शिवसेनेला लगावला.

हा वरळी कोळीवाडा पॅटर्नच शिवसेनेला अडचणीचा ठरू लागला आहे. 700 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतरही महिन्याभरापेक्षा जास्त काळ साधारण 70 ते 80 हजार नागरीकांना प्रतिबंधित करुन ठेवणे म्हणजे अडचणीचे होऊ शकते. त्यामुळे आता संपूर्ण वस्ती क्वारंटाईन करण्याऐवजी ज्या घरात रुग्ण आढळेल, तीच चाळ सील करण्याचा पर्याय पालिकेकडून स्विकारला जाऊ शकतो. केंद्राच्या शिफारशीनुसार, मुंबईत ज्या व्यक्तींना कोरानाची लक्षणे नाहीत त्याची कोरोना चाचणी केली जात नाही. मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या 70 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे एकही ताप, सर्दी खोकल्याचा रुग्ण नाही म्हणजे कोरोनामुक्ती होऊ शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com