Telangana Vidhansabha Result : तेलंगणाच्या निकालाची नांदेडकरांना विशेष उत्सुकता

मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान झाले असून येत्या रविवारी (ता. तीन) निकाल लागणार आहे.
Nanded District
Nanded Districtsakal

मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान झाले असून येत्या रविवारी (ता. तीन) निकाल लागणार आहे. या पा राज्यांत कुणाची सत्ता येणार, याकडे लक्ष लागले आहे. तेलंगणाची निवडणूकही चुरशीची झाली.

त्यात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पुन्हा तिसऱ्यांदा बाजी मारणार का, याची जशी तेलंगणातील मतदारांना उत्सुकता आहे तशीच नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनाही लागली आहे. कारण ‘बीआरएस’ राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याची सुरवात नांदेडमधून केली होती.

नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगण राज्य आहे. तेलंगणातील आदिलाबाद, निजामाबाद हे जिल्हे नांदेड जिल्ह्याला लागून आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट, भोकर, धर्माबाद, बिलोली, देगलूर हे तालुके तेलंगणच्या सीमेपासून अगदी जवळ आहेत. तेलंगणातील ‘बीआरएस’ आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यावर पहिल्यांदा नांदेडपासून महाराष्ट्रात श्रीगणेशा केला होता.

त्यानंतर त्यांनी सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर आदी ठिकाणी सभा घेतल्या. तेलंगण राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगून त्यांनी महाराष्ट्रात सक्षम पर्याय देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या काही गावांतील शेतकरी आणि गावकऱ्यांना त्यांच्या योजनांची भुरळ पडली होती. त्यावेळी आमचाही समावेश तेलंगणात करावा, अशी मागणीही काही गावांकडून झाली होती. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना आव्हानच दिले होते.

कॉंग्रेसचे येथील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षाने तेलंगणमध्ये निवडणुकीची जबाबदारी देऊन स्टार प्रचारक केले होते. त्यामुळे चव्हाण हे नांदेड व इतर जिल्ह्यांतील कॉँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ताफा सोबत घेऊन तेलंगणमध्ये तळ ठोकून होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी तेलंगणातील प्रचारासाठी नांदेडच्या विमानतळावरून गेले होते.

त्यांच्यासोबत अशोक चव्हाणही होते. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ही तेलंगणमधून नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात दाखल झाली होती. त्याचबरोबर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेना (शिंदे गट) संपर्कप्रमुख आणि इतरांनीही तेलंगणात जाऊन भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.

या शिवाय ‘बीआरएस’चे नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारीही तेलंगणमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे तेलंगण निवडणूक निकालात कॉँग्रेसचे काय होणार, याची विशेष उत्सुकता नांदेडकरांना आहे.

जरांगे यांच्या सभांची धास्ती

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची नांदेडसह जिल्ह्यात सभा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची धास्ती घेतली आहे. जरांगे पाटील सात डिसेंबरला नांदेडला मुक्कामी येणार आहेत. त्यानंतर आठ डिसेंबरला नांदेड - लातूर रस्त्यावरील जिजाऊनगरला सभा होईल. त्याच दिवशी मारतळा (ता. लोहा), नरसी (ता. नायगाव) आणि कंधार येथे सभा होणार आहे. त्यांच्या सभांची जोरदार तयारी सुरू आहे.

अवकाळीचा जिल्ह्याला फटका

यंदा जिल्ह्यात जूनमध्ये कमी पाऊस झाला. नंतर अतिवृष्टी, पावसाने पुन्हा उघडीप यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. आता अवकाळी पावसाचा फटका बसला. गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातल्याने कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. वीज पडून काही जनावरेही दगावली. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. शासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याकडे लक्ष असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com