कृषी दुकानदार एकवटले; कुठे ते वाचा...

nnd10sgp06.jpg
nnd10sgp06.jpg

हिमायतनगर, (जि. नांदेड) : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या सीलबंद सोयाबीन बॅगासह इतर बियाणे पेरणीनंतर उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी होत असून बियाणे उगवत नसल्याच्या कारणास्तव विक्रेत्यास जबाबदार धरून विक्रेत्यांवर होत असलेले गुन्ह्याबाबतचा विक्रेत्यांवरील अन्यायकारी निर्णय रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.दहा) जुलैपासून कृषी दुकानदारानी बंद सुरू केला असून, तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.


केंद्रांमधील मालाची विक्री
या निवेदनात म्हटले आहे, की राज्याच्या कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून बियाणे सीलबंद स्थितीमध्ये खरेदी करून सीलबंद स्थितीमध्येच शेतकऱ्यास विक्री करीत असल्याने बियाणे उगवत नसल्याचे कारणास्तव विक्रेत्यास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत, कृषी विक्रेता हा आयुक्तालयापासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन विक्री केंद्रांमधील मालाची विक्री करीत आहेत. कृषी आदेशांचे पालन करून व्यवसाय करीत आहेत. 


असुरक्षिततेची भावना
तरीही कृषी विक्रेत्यांवर वारंवार कार्यवाही केली जात असून, त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजीची व असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे कृषी आयुक्त यांनी कृषी दुकानदारांवरील गुन्हे त्वरित रद्द करावे विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांबद्दल तातडीने आदेश निर्गमित करावे. या मागणीसाठी हिमायतनगर शहरातील कृषी दुकाने तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्‍यामभाऊ ढगे, भास्कर चिंतावार, बाळुअण्णा चवरे, रमेश पळशीकर, मारोती पाटील लुम्दे, दिनकर संगनवार, सलामभाई, नाथा पाटील चव्हाण, रवी दमकोंडवार, श्रीनिवास सूर्यवंशी, अवधूत कल्याणकर, गुडेटवार, रमेश पाकलवार, बलपेलवाड, तुप्तेवार, शिवाजी लुम्दे यांच्यासह कृषी व्यापारी उपस्थित होते.

मारतळा (ता.लोहा) येथे बंदला प्रतिसाद
मारतळा ः सोयाबीन बोगस बियाणे न उगवल्याची ओरड होत असल्याची दखल घेत उच्च न्यायालयाने बियाणे निरीक्षक, कंपन्या व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले आहेत; मात्र बोगस बियाणे प्रकरणात कृषी विक्रेत्यांना जबाबदार धरू नये, या मागणीसाठी कृषी विक्रेत्यांनी तीनदिवसीय बंद पुकारला असून शुक्रवारी (ता.दहा) सकाळी मारतळा (ता.लोहा) येथील राज्य महामार्गावरील बाजारपेठेतील सर्वच्या सर्व दहा कृषी सेवा केंद्र बंद ठेवून, बंदला मोठा प्रतिसाद दिला. दरम्यान, संघटनेच्या वतीने निवेदनात आम्ही सीलबंद बियाणे बॅग विक्री करण्याचे काम करतो. तेव्हा बियाणे उगवण न झाल्यास आम्हाला जबाबदार धरून गुन्हे दाखल करू नये, नवीन परवाना नूतनीकरणास सर्वत्र समान रक्कम आकारावी व वेळेवर परवाने द्यावेत. तसेच संगणक पद्धतीने कामे होत असल्याने रजिस्टर नोंद पद्धत बंद करावी. मृत विक्रेत्यांचा परवाना त्याच्या वारसाच्या नावे करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी बंद पुकारल्याची माहिती दुकानदार कैलास कापसीकर, विनायक कदम वाळकीकर यांनी दिली.

संपादन - स्वप्निल गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com