Bharat jodo yatra : मन की बात नव्हे ही 'जन की बात'

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी तरुणांची भावना
Nanded
Nandedsakal

देगलूर : 'मी इंजिनिअर आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाचा नाही. पण, भाजपचे धर्मावर भेद करणे मला आवडत नाही. हा देश महात्मा गांधीचा आहे. एकाच धर्माचा नाही. सगळ्या धर्माचा आहे. ही यात्रा म्हणजे कुण्या एकट्याची मन की बात नव्हे तर ही 'जन की बात आहे', असे पोटतिडकीने आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीतून सांगत होता कर्नाटकातील राहुल दाताह हा पंचवीशितील युवक.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर मंगळवारी (ता. आठ) दुसर्‍या दिवशी यात्रेत चालताना राहुलची भेट झाली. तो म्हणाला, "खरे तर मला कन्याकुमारीपासून यात्रेत सहभागी व्हायचे होते. त्यासाठी तसे प्रयत्नही केले. पण, राहुल गांधीसोबत चालण्यासाठी माझी निवड झाली नाही. पण, थांबणे माझ्या स्वभावात नव्हते. झालं यात्रा कर्नाटकात आली. मागचा पुढचा विचार न करता पाठीवर बॅग घेतली आणि रायचूरपासून चालायला लागलो. आज माझा २३ वा दिवस आहे. आता थेट कश्मीरलाच थांबणार आहे. जिथे जागा मिळेल तिथे झोपतो. देगलूरला आल्यानंतर सोमवारी (सात) रात्री झोपायला जागाच नव्हती. थंडीत कुडकुडत होतो.‌ महाराष्ट्र पोलिसांना हे बघवले नाही. त्यांनी माणुसकी दाखवत त्यांच्या व्हॅनमध्ये घेतले. व्हॅनमध्येच झोपलो.

रस्त्यात त्या-त्या भागातील कॉंग्रेस समित्या कार्यकर्त्यांसाठी जेवण, नास्त्याची व्यवस्था करतात. तिथे मीही जेवतो. कॉंग्रेसमध्ये माझ्या कुणीच ओळखीचे नाही. राहुल गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालो. राजकारणात येण्याचा माझा अजिबात विचार नाही. फक्त देशात सर्वधर्म समभाव टिकून राहावा, याच उद्देशाने यात्रेत आहे. पास न मिळालेले देशातील कानाकोपऱ्यातून आलेले माझ्यासारखे असंख्य युवक-युवती चालत आहेत, अशी माहितीही राहुलने दिली.

जे चाललेय ते ठीक नाही

यात्रेदरम्यान उत्तर प्रदेशातील श्रावण पांडे भेटला. कॉंग्रेसच्या सोशल मीडियाचा सेवेचा तो जिल्हा प्रभारी आहे. उत्तम वक्ता असलेल्या श्रावणलाही राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी असलेला पास मिळाला नाही. तो कन्याकुमारीपासून यात्रेत आहे.‌ पण, इतर काही कार्यकर्त्यांशी असलेल्या ओळखीमुळे त्याची झोपण्याची व्यवस्था होते. सध्या भाजप सरकारमुळे देशात जे चाललेय ते ठीक नाही. राहुल यांच्या यात्रेमुळे मोठे परिवर्तन होईल असा त्याला विश्वास आहे.

एकटी तरुणी पडली घराबाहेर

अॅड. पार्वती साहू ही छत्तीसगडची तरुणीही यात्रेत भेटली. परिवर्तन व्हायला हवे, यासाठी यात्रेत सहभागी झाल्याचे तिने सांगितले. तिलाही पास मिळाला नाही. तो कधी मिळेल याची वाट न बघता तिने पहिल्या दिवसांपासून यात्रेत भाग घेतला. कुठे राहायचे, काय खायचे यांचा विचार केला नसल्याचे ती म्हणाली. केवळ राहुल गांधी कॉंग्रेससाठी चालतेय, असे तिने सांगितले.

पास का आवश्यक

राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी देशभरातून केवळ ११८ जणांची निवड करण्यात आली. त्यांना विशिष्ट पास देण्यात आला. त्या आधारे त्यांना निवास, आहार आणि रस्त्यात दुपारच्या आरामाची उत्तम सुविधा मिळते. हा पास महत्त्वाचा आहे. यासह अतिथी आणि पत्रकारांसाठी वेगळे पास आहेत. ते मोजकेच आणि रोज दिले जात आहेत. पास असलेलेच राहुल गांधी यांच्या जवळ जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com