जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यामुळे निनावी ‘पत्राला’ फुटली वाचा

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर येथील एका अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे गल्लीतील २० वर्षीय युवकाने अपहरण केले. लग्नाची चर्चा व पोलिसांचा ससेमिरा टळावा म्हणून चक्क पिडीत बालिकेसोबत हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात माळवटा येथे एका धार्मीकस्थळी लग्न केले. मात्र या प्रकरणाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यामुळे वाचा फुटली असून लग्नात अडकलेल्या बालिकेची सुटका करुन संबंधीतावर वसमत ग्रामिण पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

अर्धापूर येथील एका अल्पवयीन (वय १६ वर्ष) बालिकेस लग्नाचे आमिष दाखवून पिडीत मुलीच्या गल्लीत राहणाऱ्या युवकाने ता. नऊ सप्टेंबर रोजी पळवून नेले. यानंतर पिडीत मुलीच्या पालकांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी यात लक्ष घातले नाही. शेवटी एका सुज्ञ नागरिकाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांना निनावी पत्र पाठविले. पत्र मिळताच श्री. इटणकर यांनी प्रकरणाची गंभिरता लक्षात घेता ते पत्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला पाठविले. या कार्यालयाच्या प्रमुख रेखा काळम पाटील यांनी बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे यांच्याकडे देऊन प्रकरणाची गोपनिय माहिती काढण्यास सांगितले. यावरुन विद्या आळणे यांनी आपले सहकारी संरक्षण अधिकारी संदीप फुले आणि सामाजीक कार्यकर्त्या शितल डोंगे यांच्या मदतीने पिडीत मुलीच्या बालविवाहाबद्दल इत्यंभूत सर्व कागदपत्रांसह माहिती गोळा केली. 

हिंगोली जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचीही तत्परता
 
लग्न केल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व आपल्या वरिष्ठ यांना कळवून हिंगोली बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडे वर्ग केली. हिंगोली जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या व्ही. जी. शिंदे, सरस्वती कोरडे, गणेश मोरे, जरीबखान पठाण आणि ॲड. अनुराधा पंडीत यांनी यात लक्ष घालून माळवटा (ता. वसमत) येथे येऊन माहिती घेतली. शेवटी या प्रकरणाचा भांडाफोड झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळस वृत्तीने निनावी पत्राला अखेर वाचा फुटली असून लग्नात अडकलेल्या बालिकेची यातून सुटका होणार आहे. 

वसमत ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बालकल्याण समितीच्या रेखा काळम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी या प्रकरणाचा शोध घेऊन घटनेच्या मुळापर्यंत पोचल्या. माळवटा येथील ग्रामसेवक श्री. इंगोले यांच्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरण करणाऱ्या आणि आणि पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतांनाही लग्न लावून दिले. तसेच या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्री शिंदे करत आहेत.

बालविवाह रोखण्यासाठी समाजाने पुढ यावे

जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन असलेल्या व लग्नाच्या बेडीत अडकलेल्या युवतीची सुटका झाल्याने तिच्या पालकांनी व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा प्रकारचे आपल्या गावात किंवा परिसरात बालविवाह होत असल्यास ते रोखण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे माहिती पुरवावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com