Video - Corona : अशाही काळात हिंमत सोडायची नाही- डाॅ. केशव देशमुख

Nanded News
Nanded News

नांदेड : हिंमत सोडायची नाही. सहन करण्याचे हे दिवसच आपली दुप्पट ताकद वाढवू शकतात. ‘‘चांगला विचार करणं’’ हे औषध आपणाला मिळालं, असं मानून येणारा दिवस सुंदर करण्याचा निश्चय करुया. काळे ढग जातील आणि उद्याचा नवा प्रगतीचा सूर्य उगवेल, ही खात्री आपण एकमेकंना द्यायला पाहिजे.

माणूस आणि संकटं ही कोणत्याही काळाला आणि कोणत्याही समाजाला नवीन नाहीत. नवीन नसतात. याप्रमाणेच दुःखाचाही वारसा जगाला मुळीच नवा नाही आणि नवा नसतो. अशा परिस्थितीमध्ये सुरक्षितता, स्वच्छता, घरातच थांबण्याची प्रतिज्ञा आणि शासनाच्या यंत्रणेनं दिलेल्या सततच्या सूचना या भारतीय नागरिक म्हणून पालन करायलाच हव्यात. मनाचे आणि मनाप्रमाणे शहाणपणा कुणी करायला नको.

कोरोना भेदभाव करत नाही
‘लोक’ नावाची संस्था फार महत्त्वाची असते. या व्यवस्थेनं किंवा या लोक-संस्थेनं शासन व्यवस्थेला अशा परिस्थितीत संपूर्ण सहकार्य करायला हवे. कारण, कोरोनासारखी महामारी लहान-मोठा असं कुणाला मानत नाही. जो कुणी बजबाबदार असेल त्यावर कोरोना स्वार होऊ शकतो. तो प्रांत, धर्म, माणूस, गांव, शहर यांत फुरक करत नाही. त्यासाठी काळजी घेऊन सुरक्षित राहाणं हे सर्वात अधिक उत्तम. स्व आणि समूह, व्यक्ती आणि कुटुंब अशा विविध पातळींवर विषाणूपासून रक्षण हा विचार दृढ होणं नितांत आवश्यक आहे.

गरीबांचे अधिक हाल होताहेत
हे खरं की, गरीबांचे अधिक हाल होत आहेत. लक्षावधी हातांचा कामधंदा परागंदा झाला आहे. हातांवर ज्यांचे पोट आहे असे माणसांचे एक मोठे जग जास्त चिंतेत सापडले आहे. मोठा दगड जसा छातीवर कुणी बांधला, अशा जड स्थिती अनेक लोक अनुभवत आहेत. पण, ‘‘हेही दिवस जातीलच’’ हे विसरू नका आणि अशाही काळात हिंमत सोडायची नाही, असं मनाला सर्वांनी बजावलं पाहिजेत. ‘भित्यापाठी ब्रम्हराक्षस’ म्हटल्याप्रमाणे घाबरून, पळवाट शोधून, रडून, कुढून राहाण्यात काहीही अर्थ नाही.

युवापिढी झाली अस्वस्थ
गेलेले पन्नास पंचावन्न दिवस पूर्णतः बदलायला पुढचा मोठा काळ लागेल, हे खरेच. कारण, सारं काही थांबलेलं आहे. शिक्षणप्रणाली थांबली आहे, उद्योग रुतून बसले आहेत, पैशांची दळणवळणव्यवस्था प्रवाही राहिली नाही, बाजारांतील व्यवहारांवर विपरित परिणाम झाला. खेडी आणि तेथील माणूस अडकित्यात सुपारी सापडावी अशा अवस्थेत गवसला आहे. शिक्षण घेत असलेली युवापिढी पुष्पळ अस्वस्थ झाली आहे.

वयोवृद्धांचे प्रश्‍न ऐरणीवर
समाजातील वयोवृद्धांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. लक्षावधी लोक, दिवसरात्र एकत्र करत मूळ गावांचा रस्ता धरत धावत आहेत. प्रवासांची खासगी साधनं लोकांना आर्थिक पातळींवर लुटत आहेत. म्हणजे, काय तर प्रश्नांचा डोंगर जणू पेटला आहे. हे सगळं खरं आहे पण, यावर संयमाचं औषध कामी पडू शकतं.

धीर हा भविष्याची दिशा उजळून काढू शकते. कितीदा तरी भूकंप झाले, महापूर आले, वायुगळती झाली, चेंगराचेंगरी झाली, अनेक रोग काळानुकाल आले. गेले. याता माणूस कधीही हरलेला नाही. संघर्ष करायला आणि त्याच्याशी दोन हात करायला माणूस कधी पळून गेलेला नाही, हे विसरू नका.

जग अजून वेगाने धावेल
सगळं काही आलबेल होणार आहे. जग अजून वेगात धावणार आहे. सध्या आपण ज्यातून चाललो तो एक ‘बॅड पॅच’ आहे. जरा जास्त परिणाम भोगायला भाग पाडणारा आहे. पण, आपण जास्त सकारात्मक होऊ. कोरोना आपल्यासोबत घेऊन, त्याला सुरक्षा पातळीवर दूर ठेवत आपण चालत राहू. कारण जगात माणसाला पूर्णतः कुणीही थांबवू शकत नाही.  
- प्रा. डाॅ. केशव देशमुख, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com