तुम्हाला माहिती आहे का? नारळ, सुपाऱ्या विकून झाले डॉ. भालचंद्र मुणगेकरांचे शिक्षण...

File Photo
File Photo

नांदेड : भावना व बुद्धी जीवनाची दोन चाके आहेत. समाज हा भावनेवर नव्हे तर विवेकी कृतीवर जगतो. बुद्धिवंताने सामान्य माणसाच्या गरजा आपल्या क्षमतेप्रमाणे पूर्ण करायला हव्यात. शालेय जीवनातच मी घडलो. न्यूनगंड हा व्यक्तीमत्व विकासाला मारक असतो. म्हणून विद्यार्थ्याने न्यूनगंड बाळगू नये, असे प्रतिपादन डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. 

नांदेडला पीपल्स महाविद्यालयातर्फे आयोजित 'बदलत्या जगाच्या नव्या दिशा' या उपक्रमांतर्गत ‘मी असा घडलो’ या विषयावर शनिवारी (ता. ११) ऑनलाईन वेबिनार झाले. त्यामध्ये माजी कुलगुरु व अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी त्यांचे अनुभव कथन केले.

प्रतिकुल परिस्थितीत घेतले शिक्षण 

डॉ. मुणगेकर यांनी त्याचा जीवनपट उघडून दाखवला. ते म्हणाले की, माझी आई लहानपणीच वारली. त्यामुळे आईचा चेहराही आठवत नाही. वडिलांच्या कष्टाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. नारळ व सुपाऱ्या विकून दहावीपर्यंत शिकलो. मी सातव्या वर्गानंतरच गंभीर झालो. पाचवीपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती. दोन वेगवेगळ्या चपला पायात घालून शाळेत गेलो. शालेय जीवनातील नवभारत विद्यालयातील तो काळ माझ्यासाठी सुवर्णकाळच होता. ती माझ्या जीवनातील मंतरलेली अक्षर होती. माझ्या व्यक्तीमत्वाचा पायाच नवभारत शाळेने घडविला. खेड्यातील विद्यार्थ्यांत न्यूनगंड असतो.

सामाजिक परिवर्तन होईल असा आशावाद 

घरापासून समुद्र जवळच होता. मी समुद्राच्या विशालतेचे नेहमीच निरीक्षण करीत असे. जगातील माणसे समुद्रासारखी विशाल मनाची झाली तर सर्व समस्या सुटतील व सामाजिक परिवर्तन होईल, असा आशावाद नेहमीच वाटत असे. साहित्यिक वि. स. खांडेकरांचे साहित्य प्रेरणादायी ठरले आहे. म्हणून खांडेकरांनी महाविद्यालय हे मंदिरे आहेत; आठवडी बाजार नव्हे असे म्हटले होते. परंतु खांडेकरांच्या कादंबरीतील नायक म्हणतो की, महाविद्यालय हे मंदिर असले तरीही सामान्य माणसांसाठी आठवडी बाजारच महत्वाचा आहे. आठवडी बाजारातूनच त्याचे पोषण होते, बुद्धीपेक्षा विवेकी कृती महत्वाची आहे. 

हेही वाचलेच पाहिजे -संचारबंदी म्हणजे संचारबंदीच, उल्लंघन केल्यास...विजयकुमार मगर ​
  
कुलगुरुंनीही केले अनुभव कथन

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, मी अहमदपूर तालुक्यातील कुमठा जिल्हा परिषदेच्या शाळेतून दहावीत ८६ टक्के गुण घेऊन राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविली. त्यानंतर पॉलिटेकनिक केले. आई - वडील अशिक्षित होते. पुढे नांदेड येथील गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्यावेळी मला इंजिनीयरिंगसाठी कोणत्या शाखा आहेत, याचेही फारसे ज्ञात नव्हते. स्पर्धा परीक्षेत मी अपयशी ठरलो. हे अपयश हेच माझ्या जीवनाला दिशा देणारे ठरले. आत्मविश्वास, परिश्रम, जिद्द व चिकाटी ही यशाची चतुःसूत्री असून तिचा माझा जीवनात अवलंब केल्यामुळेच माझे जीवन घडले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी नव्हे तर स्वयंरोजगारासाठी शिक्षण हा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करा. यश हमखास मिळेल, असा मूलमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

विद्यार्थ्यांनी मानले आभार

उभय मान्यवरांचे प्रेरणादायी व स्फूर्तीदायी अनुभव कथन ऐकल्यामुळे आम्हाला स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याचे मत शेकडो विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे व्यक्त केले. प्रा. डॉ. डी. एन. मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बालाजी चिरडे यांनी तर सूत्रसंचालन तर डॉ. विशाल पतंगे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com