शेतकऱ्यांची चाढ्यावर मूठ ! पावसाचा अंदाज घेऊन होते पेरणी
शेतकऱ्यांची चाढ्यावर मूठ ! पावसाचा अंदाज घेऊन होते पेरणीSakal

सांगा... चाढ्यावर मूठ ठेवावी कशी..?

महागाईने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न; पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

कुरुळा - बदलत्या निसर्ग चक्राबरोबरच महागाईच्या सुलतानी संकटाचा बळी ठरणारा राजा यंदाच्या खरीप पेरण्यासाठी आता सज्ज होत असून नांगरणी, वखरणी अशा पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई तर दुसरीकडे शेतीच्या मशागतीचा वाढलेला खर्च, खत, बि - बियाण्यांचे वाढलेले दर यात शेतकरी होरपळून निघत असून खरिपाच्या पेरणीसाठी चाढ्यावर मूठ कशी ठेवावी? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

यंदाच्या खरिपाच्या पेरण्यासाठी बळीराजाने कंबर कसली असून कुरुळा आणि दिग्रस महसूल मंडळात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. महसूल मंडळातील उपलब्ध शेती क्षेत्रावर स्वयंचलित यंत्र आणि बैलाच्या साहाय्याने नांगरणी वखरणीची कामे अंतिम टप्यात असून कचरा वेचून शेतजमिनी पेरणीयोग्य करण्यात शेतकऱ्यांचे हात गुंतलेले आहेत. तर यंदाच्या हंगामातही सोयाबीन आणि कापूस लागवडीला शेतकरी प्राधान्य देणार असल्याचे चित्र आहे. परंतु तूर पिकांची मागील हंगामातील स्थिती पाहता तुरीची लागवड घटण्याची शक्यता आहे.

यंदा नांगरणी, वखरणीचा एकरी खर्च वाढल्यामुळे शेतकरी पैशासाठी उसनवारी करताना दिसत आहेत. याबरोबरच खते, बि - बियाण्यांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीनच्या एका बॅगमागे हजार रुपयांच्या वर दर आकारले जात असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे पेरणी खर्चासाठी कशी तडजोड करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मागील तीन हंगामापासून हाती येणाऱ्या पिकांवर अतिवृष्टीमुळे नुकसान होत असून पीकविम्यातून तुटपुंजी आर्थिक मदत होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. एकीकडे सोयाबीन विक्री करून पेरणीच्या तडजोडीत शेतकरी असतानाच ऐन पेरणीच्या तोंडावरच सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव भेटेल तो दर स्वीकारून उपलब्ध सोयाबीनची विक्री करून प्रपंचाला आधार द्यावा लागत आहे, तर पेरणी खर्चासाठी सावकारी पाशाकडे वळावे लागत असल्याचे चित्र आहे. याबरोबरच खते, बि - बियाण्यांचे भाव वाढल्यामुळे कृषी सेवा केंद्रावरही सध्या फारशी गर्दी दिसून येत नाही.

कृषी सेवा केंद्र की मेवा केंद्र?

मागील हंगामाच्या तुलनेत यंदा खतांचे दर वाढल्याने मागील हंगामातील उर्वरित खते नवीन चढ्या दराने विक्री होत आहेत. मात्र, याकडे कृषी विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. परिसरातील कुठल्याही कृषी सेवा केंद्रावर कृषी निविष्ठांचे भावफलक नसल्याने नियमांची पायमल्ली करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सेवाकेंद्र हे मेवाकेंद्र आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

कृषी विभाग आहे तरी कोठे?

पेरणीपूर्व खतांचे नियोजन, बि - बियाणांची निवड, माती परीक्षण, लागवड पद्धत, बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? यासह आदी बाबींची माहिती प्रतिवर्षी कंधार कृषी विभाग देतो. परंतु यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांत या संदर्भात कुठलीही जनजागृती केली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कृषी विभाग आहे तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com