रस्त्यांवरील फुले देताहेत सकारात्मक जगण्याचे बळ, कसे? ते वाचाच

Nanded News
Nanded News

नांदेड : कमी झालेले प्रदूषण, वाढलेले तापमान आणि अवेळी येत असलेला पाऊस या बदललेल्या वातावरणासह लाॅकडाउनमध्ये नागरिक घरात दडले असताना निसर्गाने मात्र आपला नैसर्गिक भाव कायम ठेवला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरा व परिसरामध्ये रस्त्यांच्या मधोमध, कडेला असलेल्या नेत्रसुखद फुलांनी फुललेल्या वृक्षांचे दर्शन होत असून, कोरोनाच्या संकटात सकारात्मक जगण्याचेच बळ ही फुले देत आहेत.  

कडक उन्हाळ्यात जांभळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या शेजारी ही झाडे लावली आहेत. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात. सर्रास पिवळा गुलमोहर म्हणून काही ठिकाणी ओळख असलेले अमलतास वनस्पतिशास्त्रात पेल्टोफोरम टेरोकारपम म्हणूनही परिचित आहे. या झाडाने उद्याने आणि रस्ते काबीच केले असून बघावे तेथे अमलतास फुलल्याचे दिसत आहे.

फुलांचे सौंदर्य न्याहाळायला गर्दीच नाही
वैशाखच्या वणव्यात स्वर्गसुखाचा आनंद देणारा गुलमोहोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो आहे. वर्षातून एकदाच तोही उन्हाळ्यातच गुलमोहर फुलतो. मात्र, लाॅकडाउनमुळे त्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी रस्त्यावरील गर्दीच आज गायब झालेली आहे. बोगनवेल ही हिरवट पांढरा, लालभडक, जांभळा, सर्वसाधारण दिसणारा गडद गुलाबी अथवा राणी हळदी पिवळा अशा अनेक सुंदर रंगात फुलते. या झाडाला काटे असतात. फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन या फुलोऱ्यात होते.
 
अनुकुलन क्षमता वाढविण्याची गरज
आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेले असताना प्रत्येकाच्यासमोर असंख्य आव्हाने आहेत. व्यापारपेठ ठप्प झालेले आहे, नोकरदारांच्या नोकरीवर गदा येत आहे. शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ मिळेनाशी झाली आहे. नेहमी दिमाखात मिरवणारा फुलांचा राजा गुलाब आज ग्राहकांअभावी मातीत मिसळला जातोय.

हातावर पोट आहे अशांची अवस्था तर त्याहुन बिकट आहे. प्रगत देशांमध्ये कमी लोकसंख्या, उत्तम आरोग्ययंत्रणा, स्वच्छतेबाबत जागरुकता असतानाही तिथे मृत्युचे थैमान चालू आहे. अशा परिस्थितीत आपल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष देऊन ताशेरे मारत मदतीची अपेक्षा करत बसण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीशी समायोजन करुन आपली अनुकूलन क्षमता वाढवणे जास्त गरजेचे आहे 

उन्हाळी फुले वेधतात लक्ष
प्रदूषण कमी झालेले असताना तापमानात वाढ झालेली आहे. त्याचे हवे तसे चटके जाणवू लागले आहेत. झाडांची पानगळ झाल्यानंतर ऊन वाढताच अमलतास, जारुळ आणि गुलमोहराची फुले फुलतात. त्याप्रमाणे यंदा ती फुलली आहेत. अचानक येणाऱ्या पावसामुळे पानगळ झालेल्या झाडांना पाने दिसू लागली असली, तरी उन्हाळी फुले अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
- डॉ. संदेश देशपांडे (अभ्यासक वनस्पतीशास्त्र)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com