चाकरमान्यांचे पाल्यही गिरवणार गावच्या शाळेत धडे, कसे ते वाचा?

photo
photo

नांदेड : कोरोनाच्या धास्तीने शहरात स्थिरावलेले नागरिक गावी परतले. आज, उद्या कोरोनाचे संकट निघून जाईल, या आशेवर गजबजलेल्या शहरातील जीवन ग्रामीण भागात रममान झालं. शाळा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने यंदा मुलांच्या शाळांचे काय होणार? याची चिंता लागली आहे.

शहरातील शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळा भौतिक सुविधांच्या तुलनेत मागे असल्या तरी गुणवत्तेच्या बाबतीत मागे नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे कोरोना संकटामध्ये गावाकडे आलेल्या चाकरमान्यांच्या पाल्यांनाही शाळेत अध्ययन सवलतीच्या सुचना जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी शुक्रवारी (ता.२६) स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागास दिल्या. 

कोरोना संक्रमणाचे गांभीर्य राखून शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. समिती पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करत आगामी काळात उपाययोजनांवर चर्चा करताना अध्यक्षा सौ. आंबुलगेकर यांनी इतर जिल्ह्यातून गावी परतलेल्या नागरिकांचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना शिक्षण विभागास दिल्या. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी परतलेल्या कामगार, मजुरांसह चाकरमान्यांना गरजेनुसार गावात रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेची कामे सुरू आहेत. रोजगाराचे कसेही होईल पण शहरातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पुढील शिक्षणाचे काय? असा प्रश्न इतर जिल्ह्यातून गावी परतलेल्या नागरिकांपुढे उभा आहे. केवळ मुलांच्या शाळेसाठी पुन्हा जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग ओढावण्याच्या धास्तीने चाकरमान्यांच्या झोपा उडाल्या आहेत. 

शासन निर्देशानुसार शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळांच्या भौतिक सुविधांसह पटसंख्येचा आढावा घेतला. त्यानुसार टप्याटप्याने शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी करण्यात येत आहे. शासन आदेश प्राप्त होताच ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार असल्याने शहरातून गावी परतलेल्या नागरिकांच्या पाल्यांचे काय?, शहरातील शाळेत प्रवेशित असल्यामुळे त्यांना त्याच शाळेत जावे लाणार का?, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा सुरू होणार का?, खबरदारीच्या उपाययोजनांसह शहरातील शाळा सुरू झाल्या तर पाल्यांच्या पुढील शिक्षणासाठी इच्छा नसताना पुन्हा शहराकडे धाव घ्यावी लागणार? असे अनेक प्रश्न कोरोनाच्या धास्तीने गावात स्थिरावलेल्या चाकरमान्यांना सतावत आहेत. 

मुंबई - पुणे यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून गावी परतलेल्या सव्वा लाखांवर नागरिकांचा सर्व्हे आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील बालकांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. सर्व्हेची माहिती पुढील कार्यवाहीस्तव शासनाकडे पाठवण्यात आल्याने लवकरच शासनाचे आदेश प्राप्त होणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सुचित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com