पैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान

हिमायतनगर - आजूबाजूचा परिसर कवेत घेऊन पैनगंगा वाहत असल्याने नदीकाठावरील पिकांचे नुकसान झाले. 
हिमायतनगर - आजूबाजूचा परिसर कवेत घेऊन पैनगंगा वाहत असल्याने नदीकाठावरील पिकांचे नुकसान झाले. 

हिमायतनगर - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने खरिपाच्या पेरणीतील पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. तसेच इसापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून संभाव्य धोका टाळण्यासाठी इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी पैनगंगेला पूर आला आहे. पैनगंगा नदी ही आजूबाजूचा परिसर कवेत घेऊन वाहत असल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

हिमायतनगर तालुक्यात यावर्षी पाऊस जास्त झाल्याने खरिपाच्या पेरणीतील कापूस व सोयाबीनची स्थिती नाजूक बनली आहे. पेरणीतील सोयाबीन काढणीला आले असताना या भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीनला अतिपावसाने मोड फुटले आहेत. उत्पादनाच्या प्रमुख स्रोतातील व शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे पीक उन्मळून नुकसान झाले आहे. 

मराठवाडा - विदर्भाला जोडणारा रस्ता बंद
भरीस भर म्हणून की, काय इसापूर धरणातून पैनगंगेत पाणी सोडण्यात आल्याने पैनगंगेला महापूर आला आहे. नदी आसपासची शेती कवेत घेऊन वाहत असल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमायतनगर आणि ठाणकी म्हणजेच मराठवाडा व विदर्भाला जोडणारा १८ किलोमीटरचा जवळचा असणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर गाजेगाव पुलावरून नऊ फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद पडला आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
उन्हाळ्यात याच पैनगंगेला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करावे लागते. या भागातील जनता इसापूर धरणातून पाणी सोडण्यासाठी टाहो फोडते. परंतु पावसाळ्यात मात्र धरणातून पाणी सोडण्यात येऊन पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल पैनगंगा नदीकाठावरील बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
संपादन - अभय कुळकजाईकर, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com