नांदेड : अर्धापूरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांची स्‍वच्‍छता; ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा केला संकल्प

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : राजकीय, ऐतिहासिक,संस्कृती वारसा प्राचीन काळापासून लाभलेल्या अर्धापूर शहरात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबून परिसर स्वच्छ केला. हे शहर ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. शहरात अनेक ठिकाणी प्राचीन मूर्ती, शिल्प, शिलालेख आहेत. 

अर्धापूर शहराचे जुने नाव अराध्यपूर असे आहे. याचा पुरावा शहरातील प्राचीन शिलालेखात आहे. शहरात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी केशवराज (विष्णूची दशावतार) ची मूर्ती आहे. त्यास केशव राजाचे मंदिर या नावाने ते ओळखले जाते. या परिसरास महाराष्ट्र शासनाने पर्यटनस्थळाचा क दर्जा दिला आहे. या मूर्तीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक इतिहासकार तज्ञ अभ्यासक या स्थळास भेट देण्यासाठी येत असतात. त्या बरोबरच या परिसरात असणारा बाराव्या शतकातील शिलालेख आहे. त्याचाही अभ्यास करण्यासाठी इतिहासकार या शहरात येतात.

परंतु मागच्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. ठीक-ठिकानी गवत वाढले होते. जनावरे बांधून हा परिसर अस्वच्छ केला होता. हे सर्व स्वच्छ करण्यासाठी शंकराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार याठिकाणी शुक्रवारी (ता. 25)  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात केशव राजाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन व नारळ फोडून करण्यात आली. याप्रसंगी मारुती मंदिर संस्थांनाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, गावातील प्रतिष्ठित नागरिक व्‍यंकटी राऊत, तानाजी मेटकर, गोरखनाथ राऊत, शरद पतंगे, मनोज पतंगे, विठ्ठल शिंगारे यांची उपस्थिती होती. याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अमोल सरोदे निखील मोरे, अरविंद सोनटक्के, राजू सातव, सुरेश भालेराव, सदाशिव शिंगारे व कार्यक्रम अधिकारी डॉ. रघुनाथ शेटे यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व गावकऱ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन या ऐतिहासिक पर्यटनस्थळाच्या परिसराची स्वच्छता हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. कचऱ्याचे साचलेले ढीग स्वच्छ करुन त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. अर्धापूर शहरातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा असणारा बाराव्या शतकातील सर्वात मोठा शिलालेख हा दुर्लक्षित पडलेला होता. त्या शिलालेखाची स्वच्छता करुन त्याचे जतन करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात येईल असा संकल्प स्वयंसेवकांनी हाती घेतला. केशवराज मंदिर परिसरामध्ये अनेक प्राचीन मुर्त्या सापडतात त्या व्यवस्थितपणे जतन केल्या जाव्यात. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पुढाकार घेण्यात येईल, असे मत डॉ. रघुनाथ शेटे यांनी व्यक्त केले.  

या परिसरास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून एक कोटी दहा लक्ष रुपये या पर्यटनस्थळास विकास निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिली. परिसराचा विकास व्हावा यासाठी येथील अनेक मुर्त्यांचे त्याचबरोबर परिसरात असणारे तीन शिलालेख यांचे जतन करुन त्याचा ऐतिहासिक ठेवा वारसा पुढच्या पिढीला माहित झाला पाहिजे यासाठी एक वस्तुसंग्रहालय या ठिकाणी उभारण्यात यावे अशी मागणी अनेक स्वयंसेवकानी केली.

संस्थानचे अध्यक्ष यांनी दिली त्यासाठी पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही  याप्रसंगी ते म्हणाले. सदरील परिसर हा दुर्गंधी मुक्त होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणारे विविध अभ्यासक इतिहासतज्ञ यांच्यासाठी याठिकाणी आल्यानंतर त्यांना अभ्यास करण्यासाठी सुशोभित अशा प्रकारचे एक पर्यटन स्थळवास्तू याठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे. त्याचबरोबर गावातील नागरिकांना या मंदिर परिसरात विसावा घेण्यासाठी गार्डन, त्याचबरोबर चांगले राहण्याचे ठिकाण उपलब्ध झाले पाहिजे. अशा प्रकारची मागणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संस्थांचे अध्यक्ष यांच्याकडे  करण्यात आली. 
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com