नांदेड : आधी सन्मान, नंतर अपमान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसुलीस सुरुवात

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतक-यांना शेती कामासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरु केली. या योजनेंतर्गत शेतक-यांनी एका वर्षात सहा हजाराची मदत देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्या अपात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले आहेत. अशा लाभार्थ्यांकडून पैसे वसुलीस सुरुवात झाली असून अर्धापूर तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून सुमारे ४८ लाख वसूल करण्यात येणार आहेत. तालुक्यात सध्या एक लाखांच्यावर वसूली करण्यात आली आहे. मोदीजी आधी सन्मान, नंतर अपमान असे का करताय अशा भावना शेतकरी व्यक्त करित आहेत.

केंद्रातील मोदी सरकारने २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी देशभरातील शेतक-यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना घोषित केली होती. या योजने अंतर्गत देशातील शेतक-यांना शेतीकामासाठी वर्षांत सहा हजाराजी मदत करण्यात येते. या योजनेचा लाभ कोट्यवधी शेतक-यांना मिळत आहे.या योजनेचा फायदा मोदींना लोकसभेच्या निवडणुकीत झाला.

शेतक-यांकडून आधार कार्ड बॅंक पासबुक घेण्यात आले

ही योजना घोषित झाल्यावर काही अटी व नियम तयार करण्यात आले होते. यात शासकीय नोकरी, निवृत्ती वेतनधारक, आयकर भरणारे, डाॅक्टर,अभियंता, आदींना वगळण्यात आले होते. तसेच कुटुंबातील एकालाच लाभ देण्यात येणार असे नियम व अटी होत्या. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना मिळावा यासाठी महसुल प्रशासन युध्दपाळीवर प्रयत्न केले. शेतक-यांकडून आधार कार्ड बॅंक पासबुक घेण्यात आले.

अर्धापूर तालुक्यात प्राथमिक तपासणीत ४०० अपात्र लाभार्थी

अर्धापूर तालुक्यातील सुमारे १५ हजार ३२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतक-याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. शेतक-यांनी पैसे उचलून शेती कामासाठी वापरले आहेत. या योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर अपात्र लाभार्थी शोधून पैसा वसूल करण्याचे काम महसुल प्रशासनाकडून सुरु झाले आहे. अर्धापूर तालुक्यात प्राथमिक तपासणीत ४०० अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. या अपात्र लाभार्थ्यांकडून ४८ लाखांच्यावर रक्कम वसूल करण्याचे काम सुरु झाले.

अपात्र लाभार्थ्यांकडून पैसा वसूल करण्याचे काम सुरु 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून पैसा वसूल करण्याचे काम सुरु झाले आहे. जे आयकर भरतात, शासकीय नोकरदार आहेत, एका कुटुंबात पती- पत्नी लाभार्थी आहेत. तसेच या योजनेत बसत नाहीत आशा लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात येत आहेत. शेतक-यांशी दुरध्वनी व्दारे संपर्क केला जात आहे. अपात्र लाभार्थ्यांनी पैसे भरावे असे आवाहन तलाठी रमेश गिरी यांनी केले आहे.

आधी आमचा सन्मान केला, आता आमचा अपमान 

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून शेतक-यांनी आवश्यक ती कागदपत्रे महसुल अधिका-यांना दिली. काही शेतक-यांनी कर्ज मंजूर व्हावे यासाठी आयकर भरला आहे. तसेच काही शेतक-यांनी शेती विकली आहे. जेंव्हा शेती होती तेंव्हा लाभ मिळाला होता. अशा शेतक-यांना अपात्र ठरविण्यात येते आहे. आधी आमचा सन्मान केला आता आमचा अपमान करण्यात येत आहे. मोठ- मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे सरकार आमच्याकडून सक्तीने वसूल केल्या जात आहेत. अशी तिखट प्रतिक्रिया शेतकरी दिगांबर धुमाळ यांनी दिली.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com