नांदेड - उद्धट बँक अधिकाऱ्यांना संस्काराची गरज - खासदार हेमंत पाटील संतापले

File Photo
File Photo

नांदेड - शेतकऱ्यांशी उद्धटपणे गैरवर्तन करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी कसे वागायचे हेच अजून माहित नाही. अशा उद्धट अधिकाऱ्यांना संस्काराची गरज असून, यापुढे शेतकऱ्यांशी गैरवर्तन कराल, तर खपवून घेणार नाही. अशा कडक शब्दात खासदार हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता. २१) इशारा दिला आहे.

नांदेड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती अर्थात दिशा समिती बैठक बुधवारी घेण्यात आली. त्यावेळी सहअध्यक्ष म्हणून खासदार पाटील बोलत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार राजेश पवार, आमदार भीमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी 

खासदार पाटील म्हणाले की, बँकांना जिल्ह्यात व्यवहार करायचे असेल तर सर्वसामान्य जनतेशी सन्मानाने वागले पाहिजे, अन्यथा परवाना रद्द करण्यासाठी रिजर्व्ह बँकेला सूचना करू असे म्हणत बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले. आतापर्यंत ३० टक्के पिककर्जाचे वाटप झाले आहे. हे वाटप यंदाच्या खरीप हंगामातील अत्यंत कमी आहे. याबाबत संबंदित बँकांनी तत्काळ खुलासा करावा असेही खासदार पाटील म्हणाले.

लोक अदालत घ्यावी

गोदावरी नदी स्वच्छता, हिंगोली लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या ३६१ आणि १६१ राष्ट्रीय महामार्गावरील खड्यामुळे होणारे, अपघात घरकुल योजना, दोन दिवसाआड नांदेड शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा, नांदेड शहरातील ड्रेनेज लाईनचा गंभीर प्रश्न, संजय गांधी निराधार योजनेचे निधी वाटप, जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे, पीकविमा तक्रारीबाबत तालुकास्तरावर कार्यालये सुरू करून प्रशासनाकडून लोक अदालत घेण्यात यावी आणि नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती अंतर्गत प्रलंबित घरकुल निधी या प्रश्नावर खासदार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आणि याबाबतचे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

तस्करांमुळे रेतीचे भाव गगनाला भिडले 

नांदेड दिशा समितीची बैठक तीन वर्षांनंतर होत असल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्या सर्वच महत्वाच्या प्रश्नांना खासदार पाटील यांनी प्राधान्य देऊन उपस्थित केले. गोदावरी नदी अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. वाळू तस्करांनी रेतीचे भाव गगनाला भिडविले असून सर्वसामान्य जनतेला ते परवडणारे नाहीत. त्यामुळे यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण मिळवावे, असेही खासदार पाटील म्हणाले. खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या अनेक महत्वपूर्ण प्रश्नांनी दिशा समितीची बैठक विशेष ठरली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com