नांदेडकरांनो आता घ्यावी लागणार काळजी...

file photo
file photo

नांदेड - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनच्या पहिल्या टप्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही पण दुसऱ्या टप्यात ता. तीन मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत रुग्णांची संख्या आता तब्बल ३१ रुग्णांवर जाऊन पोहचली आहे. त्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडकरांना आता काळजी घ्यावी लागणार असून प्रशासनाला देखील सहकार्य करत लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे स्वयंस्फूर्तीने पालन करावे लागणार आहे. 

नांदेड शहर आणि जिल्ह्यात लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य तसेच महापालिका सर्वच विभागांनी योग्य ती दक्षता घेतली. मात्र, दुसऱ्या टप्यात ता. २२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला आणि नंतर मग एकेक रुग्ण वाढत गेले आणि ता. तीन मे रोजी पर्यंत हा आकडा ३१ वर जाऊन पोहचला तसेच तीन मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्येकानेच काळजी घ्यावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नांदेडकरांनो आता व्हा सावध
एकंदर परिस्थिती पाहता आता कोरोनाचा शिरकाव झाल्याने नांदेडकरांना सावध रहावे लागणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणे महागात पडणार आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरातच बसून रहा. अजूनही वेळ गेली नाही त्यामुळे कोरोनाला आवर घालता येऊ शकतो. त्यामुळे घरातच राहणे, हाच एकमेव मार्ग आहे. 

लॉकडाउनचे नियम पाळा
कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात आलेल्या नियम आणि सूचनांचे पालन करा. नांदेड शहरातील पहिल्यांदा पिरबुऱ्हाणनगर त्यानंतर अबचलनगर आणि आता वजिराबादमधील गुरुद्वारा परिसर व क्षेत्रामध्ये कोरोनाचा इतरत्र प्रसार होऊ नये, म्हणून कंटेनमेंट झोन (अटकाव) घोषित करण्यात आले. तसेच तेथील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत. त्याचबरोबर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडसंहितानुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे आता जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करण्याची गरज आहे. 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहकार्य करा
नागरिकांनी देखील घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये त्याचबरोबर अफवांवर विश्‍वास ठेऊ नका आणि अफवा पसरवू नका आणि पसरू देऊ नका असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नांदेडकरांवर आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा आणि अत्‍यंत आवश्‍यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्यासाठी नांदेडकरांनी प्रयत्न करावेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com