Nanded News : नांदेड व हिंगोली लोकसभेसाठी येत्या शुक्रवारी (ता. २६) जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहेत.
नांदेडला कामगार आयुक्त कार्यालय आणि जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत सर्व आस्थापनाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये छोट्या आस्थापनावर असणाऱ्या रोजंदारी कामगारांपासून नियमित वेतन घेणाऱ्या पगारी नोकरदारांपर्यंत सर्वांना ही सवलत मिळाली पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड लोकसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी शुक्रवारी (ता. २६ एप्रिल) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.
या परिपत्रकानुसार सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापकांनी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे व सहायक कामगार आयुक्त मोहसीन अब्दुल सय्यद यांनी केले आहे.
ही सुटी राज्य शासन, केंद्र शासन व खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिग सेंटर, मॉल्स, रिटेलर आदी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.
मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित महापालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल, याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त झाली नसल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबाबची तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल.
अशा तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अब्दुल सय्यद तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.