नांदेड: जिल्ह्यामध्ये नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. पहिले ते नववीचे वर्ग ऑनलाइन घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय अभ्यास करावा लागणार आहे. गेल्या वर्षीचे फक्त १० टक्केच पुस्तके परत आली आहेत. त्यामुळे अभ्यास करायचा कसा? असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थांसमोर उभा ठाकला आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीद्वारे दरवर्षी मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी नवीन पुस्तकांची छपाई कोरोना संसर्गामुळे अजून झाली नाही. पुस्तके उशीराने मिळणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तके शाळांमध्ये जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. याकडे बहुतांश पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. एकूण शाळांपैकी केवळ १० टक्के पुस्तके परत आली. त्यामुळे मुलांना नवीन पुस्तके मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे लहान मुलांना नवीन पुस्तकांचे कौतुक असते. यावर्षी ती मिळाली नाहीत. शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक बाजारामधून पुस्तके खरेदी करण्यास असमर्थ असतात. शिक्षकांनी आॅनलाइन शिकविण्यास सुरुवात केली तरी जवळ पुस्तक नसल्याने ते काय शिकतील? हा प्रश्न आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा सुरु करा
जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आॅनलाइन वर्ग न घेता, त्या सुरु कराव्यात, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. त्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. मात्र, अद्याप कुठलीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या शाळा सुमारे ७० च्यावर शाळा आहेत.
ऑनलाइनची सोयही मिळेना
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अॅड्राईड मोबाईलची सोय नाही. शिवाय ज्यांच्याकडे सोय आहे, त्यांच्याकडे वारवार डेटा रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत. तसेच नेटवर्कचीही समस्या आहे. गेल्या वर्षीपासून हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.