नांदेड : भारतात लोकसंख्येच्या १९ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन मुलांची आहे. किशोरवयीन मुले उद्याचे नागरिक आहेत. जग बदलत चाललंय. तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं की, एका क्लीकवर सर्व माहिती तुमच्या समोर येते. किशोरवयीन मुलामुलींमध्ये जिज्ञासा अधिक असल्याने योग्य काय आणि अयोग्य काय यात भेद करणे त्यांना अवघड जाते. तो भेद सोपा करून सांगण्याची भूमिका असते ती घरातील ज्येष्ठांची. ही भूमिका पार पाडल्यास उद्याचे भविष्य हे सुंदर होते हे निश्चित.
लहान वयातील मुलांचे वर्तन हे आजीवन परिणाम करणारे असते. एकविसाव्या शतकात वाढत्या जागतिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अलिकडे मुले भरकटण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. सद्यस्थितीत माहितीचे अनेक मार्ग उपलब्ध झाल्याने योग्य काय व अयोग्य काय, या विषयात मुले गोंधळून जातात. त्यामुळे स्वतःची क्षमता विकसित होण्यास अडसर निर्माण होते. किशोरवयीन मुलांमध्ये कुतूहल, संभ्रम, भय, अशी भावना असते त्यांची धाडसी वृत्ती असते.
ज्या दिवशी मुले-मुली आरसा पाहायला लागतात त्यावेळी ते आईवडीलांपेक्षा आपल्या वयातील मुलामुलींचे विचार जास्त विचारात घेतात. त्यांची धाडसी वृत्ती जास्त असते; यात जोराने गाडी चालविणे, व्यसन लागणे, अशा सवयी लागत असल्यामुळे काही निर्णय घेताना ते दुसऱ्याचे ऐकत नाहीत.
अशावेळी ज्येष्ठ व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन, संस्कार त्यांचे अनुभव त्या मुलामुलींना सांगुन नेहमी संवाद करीत राहिल्याने त्यांचे जीवन निश्चितच सुखकर होईल. याशिवाय बालकांचा आत्मविश्वास वाढीसाठी विविध खेळ व नाटिकांमधून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
"महागाईमुळे एकाच्या पगारावर घरखर्च, शिक्षण करणे अशक्य झाले. त्यामुळे पती-पत्नी कामासाठी घराबाहेर पडत आहे. परिणामी विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांवर संस्कारच होत नसल्याने लहान वयातच मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे."
- राजारामबापू सोनटक्के, ज्येष्ठ नागरिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.