आजरा : चित्री प्रकल्पातून हिरण्यकेशी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. 200 क्युसेकने पाणी सुरू आहे. आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील अकरा बंधाऱ्यात पाणी साठा केला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणेही यंदा देखील नदीतील पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन पाटबंधारे विभागाने केल्याचे आजरा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एन. डी. मळगेकर यांनी सांगितले.
चित्रीतील यंदाचे हे पहिले आर्वतन असून पाऊस काळ लांबल्याने आवर्तनही महिनाभर लांबले आहे. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिना अखेर चित्री प्रकल्पातून पाणी सोडले जात होते. यंदा परतीचा व अवकाळी पाऊस यामुळे महिनाभर पाऊस काळ लांबला त्यामुळे ओढे व नदीमध्ये चांगल्याप्रकारे पाणीसाठा राहिला. त्यामुळे हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या पात्रात डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्याची गरज भासली नाही. गुरुवारी (ता. 23) 200 क्युसेक्सने पाणी हिरण्यकेशीमध्ये सोडले आहे. अकरा बंधाऱ्यात पहिल्या टप्प्यात पाणीसाठा केला जाईल. पहिले आवर्तन आठ ते दहा दिवस चालेल. या काळात बंधारे तुंडब भरण्यात येतील. बंधाऱ्यातील पाणी उपश्याचे नियोजनही पाटबंधारे विभागाने केले आहे.
साडे सहा हजार हेक्टर भिज क्षेत्र
चित्री प्रकल्पाचे गडहिंग्लज व आजरा तालुक्यात साडे सहा हजार हेक्टर भिज क्षेत्र आहे. सध्या शेतकऱ्यांनी नगदी ऊस पिकाबरोबर रब्बी व उन्हाळी पिक घेतली आहेत. त्याचबरोबर चारा पिकांच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. या पाण्याचा वापर ऊसाबरोबर रब्बी व उन्हाळी पिकांना मिळणार आहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत झाल्याने शेतकऱ्यांनी नदीतील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात केला नाही. त्यामुळे पाणी साठे टिकून राहण्यास मदत होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.