
पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानी देण्यात येत आहे.
जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ( जोतिबा डोंगर ) येथे येत्या रविवार( ता. २८ ) पासून होणारे जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानी देण्यात येत आहे. असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिवांना आज पाठविले आहे.
दरवर्षी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (वाडीरत्नागिरी ) येथे जोतिबा खेटेच्या कार्यक्रमावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर व परिसरात होत असते. यावर्षी दिनांक २८ फेब्रुवारी पासून पुढील पाच रविवारी जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची येथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २९ जानेवारी च्या आदेशान्वये जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे मेळावे कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा- संभाजी भिडे गुरुजींनी आमदाराला काढायला लावला मास्क पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्री यांनी १६ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील कोविड रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देवून त्यांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सुचित केले आहे. त्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, ऊरुस, इ. चे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर येथे . २८ फेब्रुवारी पासून पुढील चार रविवार संपन्न होणारे श्री जोतिबा देवाचे खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थिती पुजा करण्यास परवानगी देण्यात येत आहे. श्री जोतिबा खेटेच्या कार्यक्रमास भाविकांना व नागरिकांना प्रवेश देण्यात येवू नये, असे या पत्रात म्हटले आहे.
दर्शन वेळेत बदल
कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे दर्शन वेळत बदल करण्यात आला आहे .सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत मंदिर सुरु राहील . १२ ते ३ या वेळी मंदिर बंद असेल.
संपादन- अर्चना बनगे