कोल्हापूरातील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी प्रशासनाने आता उचलले हे पाऊल

kolhapur collector decided coronavirus testing home to home in district and person to person
kolhapur collector decided coronavirus testing home to home in district and person to person

कोल्हापूर : कोरोनाचा कहर रोखण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी आता घरोघरी तपासणी होणार आहे. एकामध्ये लक्षणे आढळली तर त्याच्या संपर्कातील, परिसरातील किमान पंधरा व्यक्तींची तपासणी अशी मोहीम शहरांसह ग्रामीण भागातही राबवू, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल सायंकाळी दिली. 

ते म्हणाले, ‘‘यासाठी शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातसुद्धा लोकसहभागातून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोनच्या पलीकडे एकास पंधरा व्यक्तींची चाचणी घेतली जाणार आहे. पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. रविवारी यासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची व्यापक बैठक होणार आहे. त्यानंतर सोमवार (७) पासून पथके कार्यरत होणार आहेत.’’

ज्यांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांच्याच टेस्ट केल्या जाणार आहेत; मात्र यासाठी केवळ प्रशासन नव्हे तर स्थानिक मंडळांतील कार्यकर्ते, प्रभाग समित्या, वॉर्ड समिती, ग्रामसेवकांचा मोहिमेत सहभाग असणार आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूदर वाढत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन आढावा बैठकीत याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे उपाय योजना म्हणून सूक्ष्म नियोजन केले जात आहे. 

प्रशासनावरील ताण कमी करणे आणि सुक्ष्म नियोजनासाठी लोकसहभाग असे नियोजन आहे. यासाठी जिल्हाधिकारी देसाई उद्या जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची चर्चा करून पथके तयार करणार आहेत. आजपर्यत केवळ कंटेन्मेट झोनमधीलच इतर व्यक्तींचे टेस्टींग होत होते; मात्र आता त्या बाहेर सुद्धा टेस्टींग होणार आहे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला आहे, अशा व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यांचा स्वॅब घेतला जाणार आहे. 

केंद्रीय सचिवांकडूनही आढावा

केंद्रीय सचिवांसह इतर अधिकाऱ्यांनी आज थेट जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी व्हीसीद्वारे आढावा घेतला. सध्या काय उपाय योजना सुरू आहेत, रुग्णांचा आणि मृत्यू दर किती आहे, कोणते हॉटस्पॉट आहेत, आणखी काय करावे लागणार आहे, कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याचीही माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.

"धाप लागल्यानंतर रुग्ण अत्यवस्थ होतो आणि रुग्णालयांच्या दारोदोरी फिरतो. यावेळी योग्य उपचार होणे अशक्‍य होते. परिणामी मृत्यू होतो, त्यामुळे मृत्यू दर वाढतो. रुग्णांवर प्राथमिक टप्प्यातच तातडीने उपचार झाल्यास मृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वेळीच उपचार व्हावेत, या उद्देशाने कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सुद्धा लोकसहभागातून टेस्टींग सुरू केले जाणार आहे."

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com