
आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र सतत पेट्रोल दरवाढ.
कागल (कोल्हापूर) : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत. आज पेट्रोलचा दर लिटरला शंभर रुपयाच्याही पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शतकवीर ठरले आहेत. त्यांनी मारलेली पेट्रोल दराचे शतक गोरगरिबांचे कंबरडे मोडणारे आहे, अशी टिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.येथील गैबी चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन झाले. यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, " आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. यामुळे गोरगरीबांचे कंबरडेच मोडले आहे. केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेले आहे. पेट्रोलसह डिझेल व गॅसच्या दरवाढीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोरगरिबांना महागाईच्या गर्तेत लोटले आहे.''
कागलमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन
जिल्हा बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले,"महागाईने हैराण झालेली जनता भविष्यात निश्चितच भाजपला हिसका दाखवेल.'' माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, दत्ताजीराव देसाई, सतीश घाडगे, गंगाराम शेवडे, नवाज मुश्रीफ, सुधाकर कोरवी, इरफान मुजावर, संग्राम लाड, सागर गुरव, पंकज खलीफ, राजू माने, बबनराव सूर्यवंशी, अजित पाटील, बच्चन कांबळे, निशांत जाधव आदी उपस्थित होते.
आंदोलनजीवी ही शेतकऱ्यांची थट्टा
मंत्री मुश्रीफ म्हणाले, हाडं गोठवणाऱ्या थंडीतही दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यातील अनेकांचा जीव गेला, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची दया येत नाही. पंतप्रधानांना त्यांच्याशी संवाद साधायलाही वेळ नाही. उलट शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून त्यांची ते थट्टा करीत आहेत. याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल.
संपादन- अर्चना बनगे