कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डातील घाऊक कांदा बाजारपेठेत कांद्याचे भाव आज अचानक वाढले. १० किलोसाठी कमीत कमी १५० ते जास्तीत जास्त ४५० रुपये असा कांद्याचा भाव झाला. दीड महिन्यापासून कांद्याचे भाव जेमतेम असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सहा महिन्यापासून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन आहे. त्यामुळे बाहेर गावावरून कोल्हापूरला होणारी कांद्याची आवक कमी झाली होती. कोल्हापुरात येणारा बहुतांशी कांदा गोवा, कोकण, केरळकडे जातो. मात्र तेथून कांद्याला मागणी कमी असल्याने कोल्हापुरातील घाऊक बाजारपेठेत कांद्याचे भाव १० किलोसाठी ३५ रुपये ते जास्तीत जास्त दोनशे रुपयांपर्यंत होते. कोल्हापुरात लोणंद, बारामती, बार्शी, इंदापूर,
श्रीगोंदा आदी भागातून कांदा येतो. त्याचा वाहतूक खर्च परवडणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याला पुरेसा भाव मिळावा, यासाठी वाट पाहिली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेकांनी कांदा कोल्हापूरच्या बाजारपेठेत आणण्यास सुरुवात केली; मात्र तेव्हा फारशी भाववाढ नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी होती. गेल्या आठवड्यापासून कांदा आवक घटली होती. लाकडाऊन शिथिल झाल्यामुळे कोकण व गोव्याकडून कांद्याची मागणी होऊ लागली आहे. चार दिवसांत कांदा उत्पादन होणाऱ्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा आवक वाढण्याची शक्यताही घटली, अशात भाव वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यास कांदा आवक वाढण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.
किरकोळ बाजारात दर स्थिरच
घाऊक बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढले असले तरी किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर आहेत. किरकोळ बाजारपेठेतील विक्रेत्यांनी महिन्याभरात कांद्याची खरेदी केली होती. तेव्हा भाव कमी होते. तोच कांदा सध्या विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव १ किलोला २५ रुपये ते ४० रुपये असे आहेत.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.