'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेच्या कथानकावर पुजारी, ग्रामस्थांचा आक्षेप 

Priest villagers object on storyline of series King Jyotiba of dakkhan
Priest villagers object on storyline of series King Jyotiba of dakkhan

जोतिबा डोंगर -  स्टार प्रवाह या  वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या कथानकाबाबत जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील ग्रामस्थ आणि पुजारी यांनी आक्षेप घेतला असून सध्या दाखवल्या जात असणाऱ्या मालिकेची कथा ही योग्य नसून जोतिबा देवाच्या सत्यकथेवर आधारित ही मालिका तयार केली जावी तसेच चुकीच्या पद्धतीने मालिका दाखवल्यास ती ताबडतोब बंद करण्याचा इशारा आज ग्रामस्थ पूजारी यांनी निदर्शने करून दिला आहे.

आज सकाळी जोतिबा मंदिराच्या समोर निर्दशने करून कोठारे व्हिजनचा निषेध व्यक्त करून ग्रामस्थ पुजारी यांनी जोतिबाचे सरपंच राधा बुणे उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांच्याकडे ही मालिका सत्य कथेवर दाखवा अन्यथा बंद करा या मागणीचे निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांकडे या मालकीकेबाबत निवेदन दिले जाणार आहे.
 

जोतिबा हे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील जणतेचे कुलदैवत आहे. देव जोतिबांच्या चरित्रावर मालिका सुरू करण्याचा निर्णय कोठारे व्हिजनने घेतल्यानंतर भक्तजनांसोबत पुजारी ग्रामस्थानांही मनस्वी आनंद झाला होता. देवाची चरित्र मालिका घराघरात पोहचेल याचा आनंद होता. 

चांगल्या कार्याला आणि माणसांना सहकार्य करावे या भावनेने ग्रामस्थ पुजारी मंडळींनी या मालिकेला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना  दिलेल्या शुभेच्छापत्रात काही अपेक्षा व्यक्त करुनच त्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

आपण जोतिबाची मालिका बनवताना प्राचीन ग्रंथ, धार्मिक व ऐतिहासिक दस्तएवज, अभ्यासक आणि लोकवाड;मय यांचा आधार घेऊन जोतिबाची योग्य, इत्थंभुत आणि विश्वासार्ह माहिती द्यावी, अशी अपेक्षा महेश कोठारे यांच्याकडे व्यक्त केली होती. 
यावर महेश कोठारे यांनी स्वतः येऊन आपण केदाराचा महिमा पूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीने मांडणार असल्याचा निर्वाळा दिला होता.

पण प्रत्यक्षात मालिका सुरू होताच जाणवलं की केदार विजय, करवीर माहात्म्य ग्रंथांत दिलेल्या कथेप्रमाणे यात काहीच घडत नाही. कलाकारांची निवड हा जरी निर्मात्यांच्या आवडीचा विषय असला तरी त्यांची वेशभूषा, भाषा याची निवड पुराणकाळाला सुसंगत नाही. कथेचा तर पूर्णपणे गोंधळ आहे. यमाई, अंबाबाई, चोपडाई यांच्या व्यक्तीरेखा कथा लेखकाला समजलेल्या नाहीत. रत्नासूराला अंबाबाईने कधी वरदान दिलं? या क्षेत्राच प्राचिन नाव मैनागिरी होतं याचा विसर लेखकाला पडलेला दिसतोय. असा सगळा गोंधळ या मालिकेत आहे. 

तेव्हा अजून देखील कोठारे व्हिजनने मालिकेत योग्य ते बदल त्वरित करून  नाथांचे मंगल चरित्र शुद्ध स्वरुपात भक्तांपर्यंत पोहोचवावे.  कथालेखकाला केदार विजय समजावून घेण्याची इच्छा असेल तर सांगण्याची तयारी पुजारी ग्रामस्थांची आहे. याची कोठारे व्हिजन आ यांनी दखल घेणे गरजेचे आहे .
 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com