धक्कादायक ; दीड महिन्यात सहा विद्यार्थ्यांनी दिले जीव ; काय आहे कारण?

six students commit suicide in one month at belgaum
six students commit suicide in one month at belgaum

बेळगाव : गेल्या दीड महिन्यात बेळगाव शहर आणि परिसरातील 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला असून अनेक पालकांना धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसात आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहावी, बारावी व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा समावेश असून विद्यार्थ्यांचे वेळीच समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे. 


शनिवारी पारिजात कॉलनी येथील एका विद्यार्थ्यांनीने घरातील लोकांनी सीएचा अभ्यास कर असे सांगितल्याने नाराज होऊन सोनाली सुरेकर हिने आत्महत्या केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आत्महत्येचा विषय ऐरणीवर आला आहे. कारण अभ्यासाची भीती, पालकांची अपेक्षा, निकालाची भीती आदी कारणांनी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउनमुळे दहावीची परीक्षा लांबल्याने जुन महिन्यात दहावीची परीक्षा जवळ आलेली असताना पालकांनी अभ्यास कर असे सांगितल्याने जुन महिन्यात पंत बाळेकुंद्री येथील मौनेश सुतार व मार्कडेंयनगर येथील युवराज बागीलकर या दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तर 25 जुन रोजी दहावीचा पहिल्या पेपर दिवशीच वडगाव येथील सुजाता ढगे या विद्यार्थीनीने परीक्षेला घाबरुन आत्महत्या केली होती. त्यानंतर संपगाव येथील विनायक चिट्टी, सदाशिवनगर कन्हैय्या महेंद्रकर या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. याचबरोबर बेळगाव जिल्हाच्या विविध भागातही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत गांभिर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. 
काही संस्था विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी पुढे येत आहेत मात्र त्यांच्याशी संपर्क साधला जात नाही. त्यामुळे नैराश्‍यग्रस्त बनलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत असून विद्यार्थ्यांसह विविध घटकातील विद्यार्थ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात असे मत व्यक्‍त होत आहे. 


सध्या स्पर्धा, महत्त्वाकांक्षा, अतिअपेक्षा आणि करिअर बाबत वाटणारी असुरक्षिततेची भावना यामुळे महत्त्वाच्या परीक्षांसाठी अभ्यास करताना, परीक्षेच्या व रिझल्टच्या दिवशी मुलं प्रचंड तणावाखाली असतात.व 'इमोशनल हायजॅक 'होऊन असे प्रकार घडतात. अशा वेळी मुलांना समजून घेऊन त्यांच्यासोबत राहून त्यांना भानावर आणल्यास हे प्रकार टाळणं शक्‍य आहे. आधीपासूनच अभ्यास, परीक्षा आणि करिअर बाबत मुलांची योग्य आणि सकारात्मक मनोभूमिका तयार करणे आवश्‍यक आहे! पूर्वतयारी म्हणून मानसशास्त्रीय समुपदेशन उपयुक्त ठरू शकते. 

-डॉ रमा मराठे, मानसोपचार तज्ञ

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com