'त्यांचा' प्रेम विवाह झाला, ते सारे मोरपंखी दिवस अन् नियतीने घाला घातला पण पतीला तिने परत ऊभा केलं...

vat purnima special story kolhapur couple stand up after Crisis
vat purnima special story kolhapur couple stand up after Crisis

कोल्हापूर - दिवस पाच वर्षापूर्वीचा, अर्थात पावसाचे दिवस, बिंदू चौकातील एक झाड विलास पांडव या तरुणाच्या अंगावर पडले, त्यात विलासच्या पाठीच्या मणक्‍याला जोरात मार लागल्याने कायमचे अपंगत्व आले. येत्या २३ जूनला या घटनेला पाच वर्षे पूर्ण होतील. मात्र, या काळात पत्नी माधवी यांनी अनेक संकटांवर मात करत पतीला मरणाच्या दाढेतून बाहेर काढले.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही ‘कणा’

आजची वटपोर्णिमा साजरी करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी झळकू लागला आहे. कारण विलास आता टूव्हीलर चालवतो आणि १ जूनपासून रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीवरही रुजू झाला आहे.घटना घडण्यापूर्वी तेवीस दिवस अगोदरच या दांपत्याचा विवाह झाला होता. प्रेम विवाह असल्याने ते सारे मोरपंखी दिवस आणि त्यातच नियतीने घाला घातला. दोघांनाही पाठबळ द्यायला जवळचे कोणच नातेवाईक नव्हते. पण, माधवी यांनी पदर खोचला आणि पतीला नव्या उमेदीने उभे करण्याचा संकल्प केला. विलास यांच्यावर तीन वर्षे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. विन्स हॉस्पिटल व्यवस्थापन आणि डॉ. संतोष प्रभू, डॉ. सुजाता प्रभू यांनी त्यांना मोलाची मदत केली. विलास व माधवी दोघेही गडहिंग्लज तालुक्‍यातील. कॉलेजमध्ये प्रेम जुळले आणि त्यातूनच त्यांच्या आयुष्यभराच्या गाठीही जुळल्या.

माधवी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून डबा आणण्यासाठी मोटरसायकलवरून जाताना विलास यांच्यावर हा आघात ओढवला. दोन्ही पाय निकामी झाले आणि अंपगत्व आले. उठून बसण्याचीही ताकद नव्हती. उपचारासाठी १५ ते २० लाखांचा खर्च येणार होता. मात्र, तितकी परिस्थितीही नव्हती. त्यांची हीच कैफियत ‘सकाळ’ने मांडली आणि बघता बघता समाजातून दातृत्वाचा ओघ सुरू झाला. उपचाराला गती आली. चालण्याइतपत नाही, पण उठून बसण्याइतपत हालचाल करण्यापर्यंत डॉ. प्रभू यांनी त्याच्यावर यशस्वी उपचार केले.तसेच आता उपचारापाठोपाठ विन्स हॉस्पीलमध्ये नोकरीही दिली आहे. ‘हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप्ड’ संस्थेतून विलासने अपंगांसाठीचे प्रशिक्षण घेतले आणि आत्मविश्‍वासाने त्यानेही पुढील वाटचाल सुरू केली. माधवी येथील मायक्रोपॅथ लॅबमध्ये नोकरी करतात. तेथील डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. मनीषा कुलकर्णी यांनीही या दांपत्याला मदत केली.

‘सकाळ’ने दिले बळ...

विलास आणि माधवी यांच्यावर कोसळलेल्या या संकटाची कैफियत ‘सकाळ’ने ‘संसार वाचविण्यासाठी तिची धडपड’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध करताच समाजातून दातृत्वाचा ओघ सुरू झाला. पण, पत्नी माधवीने जगण्याची नवी उर्मी दिली. ‘सकाळ’ आणि कोल्हापूरकरांनी तर मला जणू पुनर्जन्मच दिला, असे विलास पांडव आवर्जून सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com